वसईः कोकणी बांधवांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या उत्थानासाठी वसई-विरार शहरात ‘मालवणी भवन असायला हवे, अशी अपेक्षा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी व्यक्त केली आहे. वसई, नालासोपारा व विरार हा परिसर वेगाने विकसित पावत आहे. या तीनही शहरात विविध व्यवसाय व नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई-ठाणे परिसरातूनही मोठ्या प्रमाणात वसईत कोकणी माणूस स्थलांरित झालेला आहे. ५० टक्क्याहून अधिक कोकणी माणूस आज वसई-विरार शहरात स्थायिक आहे. ठाणे-रायगडपासून थेट तळकोकणापर्यंतचा माणूस आज वसईच्या हृदयात ‘घर करून आहे. वसईच्या मातीशी हा बांधव एकरूप झाला असला तरी कोकणीची संस्कृती आणि आपली खास अशी ओळख त्याने जपलेली आहे.
सामाजिक, राजकीय, व सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, भजन, मेळावे व भावकीच्या बैठका यांसोबतच समाजातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक प्रगतीच्या निमित्ताने कोकणी बांधव नेहमीच एकत्रित येत असतो. मात्र, वसईत त्यांच्यासाठी सार्वजनिक व्यासपीठ अथवा भवन नाही. त्यासाठी त्यांना खासगी सभागृह अथवा मैदानांचा सहारा घ्यावा लागतो. अशा वेळी वसई-विरार शहरात ‘मालवणी भवनसारखी संकल्पना साकारली गेली, वास्तू उभारली गेली तर कोकणी बांधवांसाठी तो मोठा आधार ठरेल. त्यातून सामाजिक एकोपा वाढीस लागून वसई शहराला नवी ओळखही प्राप्त होईल, अशी आपुलकीची भावना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी व्यक्त केली आहे.