डहाणूः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी उड्डाणपुलाखालून नाशिक-डहाणू राज्यमार्ग गेला आहे. या पुलाखालून डहाणू -मुंबईकडे जाणार्या, नाशिककडे जाणार्या तसेच नाशिक -जव्हार वरून डहाणूकडे जाणार्या वाहनांची वर्दळ मोठी असते. त्यातच पुलाखाली अरुंद बोगदा असतानाही मोठाले कंटेनरची वाहतूक सुरु असते. त्यामुळे पुलाखाली दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सध्या डहाणू ,वाणगाव भागात रेल्वे रुंदीकरण, ब्रिज बांधणे , बुलेट ट्रेन, बडोदरा एक्सप्रेस ही कामे सुरू आहेत. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी करण्यासाठी अनेक वाहनांची ये-जा सुरु असते. त्याचबरोबर अदानी कंपनीच्या दररोजच्या शेकडो वाहनांची वाहतूक सुरु असते.
या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ता आहे. पण, मुंबईकडे जाणार्या सेवा रस्त्यावर महामार्गावर होणार्या अपघातातील अपघातग्रस्त वाहने पार्क केली जातात. याच मार्गांवर पुढे मुंबई घोडबंदरकडे जाणारी प्रवासी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. चारोटी उड्डाणपुलाच्या गुजरात कडे जाणार्या सेवा रस्त्यावर अनेक प्रवासी रिक्षा , इको गाड्या उभ्या असतात. मोठमोठे कंटेनर येथून वळवले जात असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. त्यातच सेवा रस्त्यावर अनेक फेरिवाले अरुंद असणारी जागा अडवून बसल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. एखादी रुग्णवाहिका आल्यास गोंधळ उडतो. या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी चारोटी उड्डाणपुलाखाली पोलीस प्रशासनाने दोन पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
उड्डाणपुलाखालील अरुंद बोगद्यातून कंटेनरची ये-जा असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे. अनेकदा अपघात होतात. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसही उपस्थित नसतात. वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी कंटनेरन पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक केली पाहिजे.
—शैलेश शेंडे, वाहन चालक