कोरोना असल्याने पावणेदोन वर्षे वसईतील यात्रा बंद होत्या. मात्र, राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर यात्रांनाही परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे वसईतील प्रसिद्ध निर्मळ यात्रेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा १४ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. कोरोनामुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प पडले होते. त्यात मंदिरेही बंद होती. त्यामुळे यात्राही बंद होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे नियम पाळून यात्रा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. वसईतील निर्मळची यात्रा ही पहिली यात्रा असते. या यात्रेपासून इतर यात्रांना सुरुवात होते. आद्य शंकराचार्य (शके ७०२ ते ७३४) यांचे समाधीस्थान असलेल्या श्री क्षेत्र निर्मळची यात्रा ३० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कोरोना काळात न झालेल्या यात्रेची प्रतीक्षा संपली आहे.
वसई तालुक्यातील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र निर्मळ येथे श्रीमद शंकराचार्य समाधी मंदिर हजार दिड हजार वर्षापूर्वीची आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी श्रीमंत पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. तेव्हापासून या उत्सवाला सुरुवात झाली. भगवान परशुरामाची भूमी असलेल्या निर्मळच्या यात्रेला दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होत असते. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील लाखो भाविक या यात्रेला येत असतात. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेत लहान मुलांच्या खेळणींपासून वृद्धांच्या अंगरख्यापर्यंत आणि कंदी पेढेपासून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध असतात. तसेच बालकांसाठी असलेल्या गोल चक्रीपासून आकाश पाळण्यापर्यंत आणि जादूचा प्रयोगापासून मौत का कुवा पर्यंतचे अनेक मनोरंजनात्मक खेळ याठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे या यात्रेला सायंकाळी चारपासून रात्री बारापर्यंत तुफान गर्दी असते.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दोन डोसचे लसीकरण जवळपास पूर्णत्वास येऊन करूनच संसर्ग कमी झाल्यामुळे यंदा या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरार महापालिका,पोलीस आणि विश्वस्त मंडळाद्वारे या यात्रेचे नियोजन केले जाते. ३० नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत यंदा ही यात्रा चालणार असून, यात्रेमध्ये एकादशीच्या दिवशी भाषिक महाराष्ट्र राज्य व बाहेरील राज्यातील लोकं पिंडदान करण्यासाठी श्री क्षेत्र निर्मळ येथे येतात. यंदा भल्या पहाटे अभिषेक आणि पूजन करून यात्रेला सुरुवात होईल. १ नोव्हेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता श्रीमद् जगदगुरु शंकराचार्य यांची पालखी निघेल. विमल सरोवराला प्रदक्षिणा घालून पहाटे ६ वाजता तिचे मंदिरात प्रस्थान होईल.
हेही वाचा –
Parambir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल