शशी करपे,वसईः राज्यात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात विस्तव जात नसताना वसईतील दोन्ही गटाचे मराठा समाजातील नेते मात्र मराठा आंदोलनाच्या निमित्ताने थेट रस्त्यावर एकत्रपणे आंदोलन करताना दिसून आले. आधी समाज, मग पक्ष. समाजापेक्षा पक्ष मोठा नाही, असा थेट घणाघात सकल मराठा समाजाचे वसई तालुका उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांनी केला आहे. सध्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. जालना येथे मराठा समाजावर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्याचे पडसाद वसईतही उमटले. त्यावेळीही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष शिरीष चव्हाण यांनी मैदानात उतरून निदर्शने केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनात सहभागी होणारच, असे सावंत यांनी सांगितले.
समाजाने आम्हाला ओळख करून दिली. समाजापेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही. आधी समाज मग पक्ष. समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठीच्या लढ्यात सक्रीय असणारच. त्यासाठी पक्षाने कारवाई केली तरी फरक पडत नाही, असेही सावंत यांनी सांगितले. आरक्षणासाठी आता हा निर्णायक लढा आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठे पेटून उठले आहेत. आंदोलनकर्ते कोणताही पक्ष पाहत नाहीत हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना घेराव घालून समाजाने दाखवून दिले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप सरकार अनेक निर्णय घेत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचाही निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे, असेही सावंत यांनी सांगितले.
बॉक्स
विश्वास सावंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यावर सावंतही काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. आता राणेंसोबत तेही भाजपमध्ये सामिल झाले आहेत. मागील महिन्यात वसई -विरार जिल्हा भाजपची कार्यकारिणी जाहिर झाल्यावर सावंत यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंत यांच्या तक्रारीची दखल घेऊन भाजपच्या वसई- विरार जिल्हा संपर्कनेत्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे वसई भाजपमध्ये खळबळ उडाली होती.