वाडा : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा येथे घेतलेल्या विकास कामांच्या आढावा सभेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी अधिकार्यांवर हल्लाबोल केला. त्यामुळे तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नियमित होणार्या मासिक सभांना अधिकार्यांना जाब विचारून त्यांच्यावर वचक ठेवण्याऐवजी या सदस्यांना आमदारांच्या आढावा सभेचा आधार घ्यावा लागत असल्याची चर्चा सभागृहात रंगली होती. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वाडा येथील पंचायत समिती सभागृहात आढावा सभा आयोजित केली होती.
या वेळी तालुक्यातून आलेले कार्यकर्ते ,सरपंच ,उपसरपंच ,पं. स. सदस्य ,जि. प. सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ,कृषी विभाग ,महावितरण ,वन विभाग यांच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाढा वाचला. वन विभागाच्या अडवणुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. कृषी विभागाकडून शेतकर्यांना पिक विमा ,नुकसानभरपाई यांबाबत सहकार्य मिळत नाही. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या नागरिक ,जनावरे यांना भरपाई देण्याबाबत महावितरणचे अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार केली .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार्या अनेक रस्त्यांची दुरवस्था असल्याचा रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. चिंचघरचे उपसरपंच मनेश पाटील यांनी पी एम किसान सन्मान निधी वितरणामध्ये असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. महसूल व कृषी विभागाच्या टोलवाटोलवीत शेतकरी भरडला जात असल्याची तक्रार त्यांनी केली. या आढावा सभेस शिवसेना उपनेते प्रकाश पाटील ,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम ,समाजकल्याण सभापती मनीषा निमकर ,कृषी सभापती संदीप पावडे ,महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार ,वाडा पंचायत समिती सभापती अस्मिता लहान्गे ,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे ,तहसीलदार भाऊसाहेब अंधारे ,पोलीस निरीक्षक सुरेश कदम ,गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ ,जि. प. सदस्य ,पं. स. सदस्य ,सरपंच ,उपसरपंच व अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.