घरपालघरयंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या चालणार नाहीत

यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या चालणार नाहीत

Subscribe

पर्यावरणपूरक मुर्तींना परवानगी देत असलेल्या महापालिकेने सजावटीवरही निर्बंध लागू केले आहेत. मूर्तीचे दागिने बनवण्यासाठी वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावयाचा आहे.

वसई : वसई-विरार महापालिकेने आगामी गणेशोत्सव अधिकाअधिक पर्यावरणस्नेही करण्यासाठी अनेक निर्बंध जारी केले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्यात आली असून गणेशोत्सव सजावटीसाठी नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.वसई-विरार महापालिकेने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण स्नेही साजरा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी केंद्रीय प्रदूषण मंडळाने २०२० साली प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात मूर्ती आणि सजावट संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने असायला हवी. त्यासाठी महापालिकेने निकष जाहीर केले आहेत. गणपती मूर्ती या पारंपरिक सदगुण चिकण माती आणि चिखल यामध्ये तुरटी मिसळून बनवलेल्या कच्च्या मालापासून तयार करणे बंधनकारक आहे. मूर्तीमध्ये कोणताही विषारी अजैविक कच्चा माल, पीओपी प्लास्टीक थर्माकोल (पॉलीस्टीरीन) आदींना बंदी आहे. पर्यावरणपूरक मुर्तींना परवानगी देत असलेल्या महापालिकेने सजावटीवरही निर्बंध लागू केले आहेत. मूर्तीचे दागिने बनवण्यासाठी वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावयाचा आहे.

मूर्ती आकर्षक बनवण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मूर्ती आणि पंडालच्या सजावटीसाठी पेढ्याचा सांगाडा किवा उसाच्या कांड्याचे पिरॅमिड यासारखे पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरण्यास सांगण्यात आले आहे. मूर्ती रंगवण्यासाठी कृत्रिम रंग आणि सजावटीसाठी विघटनशील साहित्यावर बंदी घालण्यात आली आहे. विषारी अविघटनशील, ऑईल पेंट इनॅमल आणि कृत्रिम रंगावर बंदी आहे. मूर्ती रंगवण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारिक रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगांचा वापर करावा लागणार आहे. वनस्पती, फुले, साल, पाने, बिया, फळे, पक्ष्यांची पिसे, रंगीत खडक अशा नैसर्गिकरित्या तयार होणार्‍या रंगाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

यंदा देखील कृत्रिम तलाव

मागील वर्षी वसई – विरार महापालिकेने कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला होता. शहरातील तलाव बंद करून ८३ ठिकाणी कृत्रिम तलाव आणि ३१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. एकूण विसर्जनाच्या ६३ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले होते. दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनापैकी ७० टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात, गौरी गणपतीला ५४ टक्के तर अनंत चतुर्दशीला ६० टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले होते. त्यामुळे यंदा देखील हा प्रयोग राबवला जाणार असून त्यादृष्टीने जनजागृती केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -