राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे फर्मान काढल्याने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयही सतर्क झाले आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शंभरहून अधिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोलिसांसोबत एसआरपीएफची तुकडी आणि होमगार्डही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
अजान करणार्या मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर जातीय सलोखा व तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.
जातीय सलोख्यात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य अथवा सामाजिक माध्यमांवर संदेश, फोटो किंवा व्हिडीओ प्रसारित करण्यात येऊ नये. सध्याच्या राजकीय व धार्मिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा हातात घेऊ नये. जो कायद्याचे उल्लघंन करेल किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करताना दिसून येईल त्याच्यावर प्रचलित कायद्याच्या अनुषंगाने सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिला आहे.
पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्या इममांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९प्रमाणे १००पेक्षा जास्त नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सध्याच्या राजकीय व धार्मिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयात शांतता राखण्याच्या उद्देशाने आयुक्तालयातील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या पुढील आदेशापावेतो रजा रद्द करण्यात आल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्यासोबत एसआरपीएफची तुकडी व होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कलम १३७ (१) (३) महाराष्ट्र पोलीस कायदाप्रमाणे प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणीही विनाकारण जमाव जमवू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे भान राखून आपापल्या परिसरात शांतता राखावी. जातीय सलोखा आबाधित ठेवावा, असे आवाहनही आयुक्त दाते यांनी केले आहे.