भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात अनेक आरएमसी प्लांट हे नियमांचे उल्लंघन करत सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याच्या अनेक तक्रारी महापालिका आयुक्तांकडे येत आहेत. पूर्वी या प्रकल्पाला सहायक आयुक्त हे परवानगी देत होते. त्यामुळे या प्रकल्पाला परवानगी देताना अटी शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त संजय काटकर यांनी शहरात नव्याने सुरू करण्यात येणार्या सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना (आरएमसी) परवानगी देण्याचे अधिकार आता महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांना दिले आहेत. तर विनापरवानगी सुरू असलेल्या आरमसी प्लांटमुळे पर्यावरण प्रदूषणात वाढ झालेली आहे.
मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रहिवासी क्षेत्रात आरएमसी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. हे प्रकल्प नियमांचे उल्लंघन करत चालवले जात असल्याने त्या परिसरात धूळ मोठ्या प्रमाणात उडते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण तयार होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हे आरएमसी प्लांट सुरू करण्यासाठी रहिवासी क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत मान्यता देण्यात येऊ नये, असा धोरणात्मक निर्णय काही वर्षांपूर्वी महासभेने मंजूर केलेला असताना देखील अनेक प्रकल्प रहिवासी क्षेत्राला लागूनच सुरू करण्यात आले आहेत. सुरू करण्यात आलेले आरएमसी प्लांट हे स्थानिक राजकीय पुढार्यांचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अधिकारी या प्लांटकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरात प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी आरएमसी प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी या प्रकल्पाकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले आहे. याची दखल घेत आयुक्त संजय काटकर यांनी आरएमसी प्लांटला परवानगी देण्याचे अधिकार नगररचना विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.