वसईः गणेशोत्सवाकरता कोकणात जाणार्या चाकरमान्यांची संख्या पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नालासोपारा आगाराप्रमाणेच अर्नाळा आगारातून एसटी बस सोडाव्यात. विशेषत: नालासोपारा येथून सुटणार्या एसटी बसला विरार-मनवेलपाडा येथे थांबा देऊन कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना विरार शहर प्रमुख उदय जाधव यांनी केली आहे. कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा गणेशोत्सव तोंडावर आहे. त्यासाठीची त्यांची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. अनेकांनी रेल्वे गाड्यांचे, खासगी बसेसची आगाऊ आरक्षण करून ठेवलेले आहे. कोकणात जाण्यासाठी नालासोपारा आगारातून वर्षभर तसेच उत्सवांदरम्यान अनेक एसटी बसेस सोडल्या जात असतात. पण, अर्नाळा आगारातून कोकणात जाण्यासाठी उत्सव काळात किंबहुना वर्षभरात एसटी बस सेवा उपलब्ध नाही. विरार शहरात स्थायिक असलेल्या कोकणी बांधवांना, चाकरमान्यांना खिशाला परवडणार्या एसटी बस सेवेसाठी नालासोपारा येथे जावे लागते. पावसाळ्यादरम्यान नालासोपारा येथे पाणी साचत असल्याने प्रवाशांना तिथपर्यंत पोचण्यात अडचणी येतात, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे.
नाईलाजाने अनेकांना विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथून कोकणात जाणार्या खासगी बसेसची बुकिंग घ्यावी लागते. खासगी बसेस अवाढव्य तिकीट दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करतात. खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबवून एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नालासोपाराप्रमाणेच अर्नाळा आगारातून देखील गणेशोत्सव व अन्य सणासुदीच्या दिवसांत जादा एसटी बस सेवा सुरू केल्यास कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल. त्यामुळे या मागणीवर तातडीने विचारविनियम करून कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.