वाडा: जव्हार-विक्रमगड-वाडा या महत्वाच्या राज्य मार्गावरील अनेक बसफेर्या गेल्या सहा महिन्यांपासून जव्हार-मलवाडा-वाडा या जिल्हा मार्गावरुन फिरविल्याने विक्रमगड मार्गे प्रवास करणार्या प्रवाशांवर अधिक पैसे खर्च करून खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक बसफेर्या कमी झाल्याने खासगी वाहतूक दारांना कमाईची संधी मिळाली आहे. जव्हार बस स्थानकातून वाडा, ठाणे, कल्याण, नगर, पंढरपूर, वसई या शहरांकडे जाणार्या दररोज 16 बसफेर्या निघतात. या बसफेर्यांमधील अवघ्या 7 बसफेर्या अत्यंत महत्त्वाचा व अधिकचे थांबे असलेल्या विक्रमगड मार्गे सुटतात. तर 9 बसफेर्या या कमी थांबे असलेल्या मलवाडा मार्गे सुटतात. यामुळे विक्रमगड मार्गावरील विविध थांब्यावर प्रवाशांना तासनतास बसची वाट पहावी लागते. अनेकदा या मार्गावरील प्रवाशांना अधिकचे पैसे खर्च करून खासगी मिनिडोअर, रिक्षा, जीप या प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांतून प्रवास करावा लागतो.
जव्हार येथून मलवाडा मार्गे एका प्रवाशासाठी 60 रुपयांचे तिकीट दर आहे. तर विक्रमगड मार्गे 80 रुपये तिकिटाचा दर आहे. 20 रुपये व 15 ते 20 मिनिटे वेळेची बचत होत असल्याने मलवाडा मार्गे अधिक प्रवासी मिळतात. यामुळे यामार्गे जास्त बसफेर्या सोडल्या जात असल्याचे एसटी कर्मचार्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान एसटी बसमध्ये महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत केल्यापासून अनेक बस थांब्यावर महिलांची मोठी गर्दी दिसून येते. विक्रमगड मार्गे बस फेर्या वाढविण्याची अनेक महिलांनी मागणी केली आहे.
प्रवाशांची मागणी काही दिवसांपूर्वीच आलेली आहे. लवकरच विक्रमगड मार्गावर वाड्याकडे जाणार्या बसफेर्यांत वाढ केली जाईल.
– राजेंद्र जगताप , विभाग नियंत्रक, पालघर विभाग