वसई : वसई-विरार महापालिकेत सेवा देत असलेले सफाई कर्मचारी लक्ष्मी चाळ या वसाहतीत अनेक वर्षांपासून राहत आहेत. यातील बहुतांश कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनीही नगर परिषद काळापासून वसई-विरारकरांना सफाई कर्मचारी म्हणून सेवा दिलेली आहे. परंतु हे सफाई कर्मचारी अनेक समस्या आणि अडचणींना आज तोंड देत आहेत. सफाई कर्मचारी राहत असलेली लक्ष्मी चाळ जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे या कर्मचार्यांसमोर निवार्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही या वसाहतीतील रहिवाशांना रोज संघर्ष करावा लागत असल्याची खंत या कर्मचार्यांनी भाजपचे वसई विधानसभा समन्वयक मनोज पाटील यांच्याकडे व्यक्त केली. सुविधांच्या नावे महापालिका त्यांच्या पगारातून पाच हजार तीनशे रुपये कापून घेते. पण पिण्याच्या पाण्यासाठी साधा ‘स्टँड पोस्ट देण्याची तसदीदेखील पालिकेने घेतलेली नाही, अशी वेदनाही या कर्मचार्यांनी मनोज पाटील यांना सांगितली.
‘वसई-विरारकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मेहतर समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. या समाजातील बहुतांश स्त्री-पुरुष नगर परिषद काळापासून आजपर्यंत सफाई कर्मचारी म्हणून वसई-विरारकरांना सेवा देत आहेत. पण हा स्वच्छतादूतच आज अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या समाजाला आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. या स्वच्छतादूतांची काळजी वाहणे, ही महापालिकेची पर्यायाने आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या समाजातील कर्मचार्यांच्या समस्या-अडचणी सोडवण्यास भाजप कटिबद्ध आहे, अशा शब्दांत भाजप वसई विधानसभा संघटक मनोज पाटील यांनी मेहत्तर समाजातील सफाई कर्मचार्यांना आश्वस्त केले.
दिवाळीनिमित्त वसई भाजपच्यावतीने वंचित/ आदिवासी समeजाच्या पाडे /वस्त्यांना भेट देऊन लहान मुलांना खाऊ व मिठाई वाटप करून सर्वांची दिवाळी गोड करण्यात येत आहे. भाजप वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी नवघर येथील कातकरी वस्ती, दिवाणमान डोंगरी आदिवासी पाडा,वसई-दत्तधाम आदिवासी पाडा, दत्तधाम कुष्टरोग वसाहत आणि वाघरी पाड्यालाही भेट दिली. या प्रसंगी त्यांच्या सोबत वसई मंडळ सरचिटणीस अमित पवार, कल्पना खरपडे, प्रीतम राऊत, मन्मीत राऊत, प्रतीक चौधरी, नवघर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, सिद्धेश तावडे, बाळा सावंत, संकल्प राऊत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.