वसईः विविध व्यवसाय आणि नोकरीनिमित्ताने कोकणस्थित बहुतांश लोक वसईत राहत आहेत. अनेकदा त्यांना आपल्या मूळगावी प्रवास करावा लागतो. मात्र वसई-सावंतवाडी यादरम्यान सद्यस्थितीत एकही रेल्वेगाडी नसल्याने प्रवासासाठी त्यांना दादर अथवा ठाणे स्थानकांत जावे लागते. त्यामुळे वसई-सावंतवाडी दैनंदिन विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.मागील काही वर्षांत विरार-नालासोपारा व वसई परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. यातील बहुतांश लोक हे कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील आहेत. या परिसरात कोकणातून आलेल्या व मुंबईतून विस्थापित झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांची मातीशी नाळ जुळलेली असल्याने गणेशोत्सव, होळी, महाशिवरात्र व एप्रिल-मे महिन्यात त्यांचे आपल्या मूळ गावी येणे-जाणे असते. मात्र गावी जायचे झाल्यास या सर्वांना रेल्वे अथवा खासगी बस व एसटी यांचाच पर्याय उरतो.
रेल्वेने कोकण अथवा उर्वरित महाराष्ट्रात जायचे झाल्यास दादर, सीएसटी अथवा कुर्ला, ठाणे किंवा पनवेल हा पर्याय आहे. एसटीकरता अर्नाळा अथवा नालासोपारा एसटी आगार हा पर्याय आहे. दुर्दैवाने एसटीच्या माध्यमातून विरार-अर्नाळा येथून एकही बस कोकणात सुटत नाही. साखरपा येथून विरार येथे एक तर गुहागर येथून विरारकरता दोन बसची सोय केली जाते. तर रेल्वेकरता मुलाबाळांसह ओझे वागवत धावपळीचा दादर, सीएसटी अथवा कुर्ला, ठाणे किंवा पनवेलपर्यंचा प्रवास करावा लागतो.
या परिसरात राहणारे रहिवासी हे मध्यमवर्गीय व निम्न स्तरातील हातावर पोट असलेले असल्याने त्यांचे गावी निश्चित नसते. काही जण प्रसंगानुसार गावी जात असल्याने रेल्वे तिकिट बुकिंग करून त्यांना गावी जाणे शक्य होत नाही. शिवाय हा प्रवास धावपळीचा असल्याने वसई व विरारहून कोकणात रेल्वे गाडी असाव्यात, अशी मागणी कित्येक वेळा प्रवाशांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मात्र या वाढत्या जनमागणीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
अशावेळी या प्रवाशांजवळ खासगी बसचा पर्याय उरतो. मागील काही वर्षांत येथील रहिवाशांची वाढती गरज ओळखून खासगी बस मालकांनी विरार येथून कोकणात बस सोडण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र या माध्यमातून ‘सिझनच्या नावाखाली या प्रवाशांची सर्रास लूट होताना दिसत आहे. वास्तविक एसटी तिकिटाच्या दीड पट खासगी बसचा तिकीट दर असला पाहिजे, हा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडक घालून दिलेला आहे. मात्र या नियमाचे सर्रास उल्लंघन करून प्रवाशांच्या हतबलतेचा आणि गरजेचा गैरफायदा विरार येथील तिकीट विक्रेत्यांकडून घेतला जात आहे.याबाबत अनेकदा तक्रारी करूनही उपप्रादेशिक परिवहन विभाग किंवा वाहतूक पोलीस यांच्याकडून कार्यवाही होत नसल्याने सामान्य प्रवाशांची ही लूट कायम आहे.