डहाणू : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शासनाकडून देण्यात येणार्या सुविधांच्या बदल्यात टोल रुपी कर आकारला जातो. टोलच्या बदल्यात महामार्गावर आवश्यक सुविधा पुरवणे हे कंत्राटदार कंपनीची जबाबदारी असते. मात्र, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानीवडे, चारोटीसह गुजरातमधील उदवाडा येथील टोल नाक्यांवर टोल भरून सुध्दा नागरिकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. महामार्गावर देण्यात येणार्या सुविधांपैकी बहुतेक सुविधा नागरिकांना मिळत नसल्याच्या अनेक तक्रारींचा पाढा कायमच वाचला जातो. त्या अनुषंगाने सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर अशा कायमच तोकड्या असलेल्या सुविधांचे सांकेतिक श्राद्ध घालण्यात आले आहे. गेल्या वर्षी देखील असेच श्राद्ध पालघर मधील मेंढवण या अपघात प्रवण क्षेत्रात घालण्यात आले होते. यंदा हे श्राद्ध गुजरातमधील उदवाडा व पलासाना येथे घालण्यात आले असून येथे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महामार्गावर होणार्या अपघातांना प्रत्येकवेळी चालकांना जरी जबाबदार ठरवले जात असेल तरी महामार्गावरील तांत्रिक त्रुटीदेखील त्यासाठी तितक्याच जबाबदार असल्याचे मत ऑल इंडिया वाहन चालकमालक संघाचे प्रवक्ते हरबंससिंग नंनाडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच महामार्गावर अपघातात मृत सर्व जातीधर्माच्या लोकांच्या आत्म्यास शांती मिळावी ह्यासाठी सर्वधर्मीयांच्या वतीने देखील हे श्राद्ध घालण्यात आले आहे,असे त्यांनी सांगितले आहे. महामार्गावर ज्या सुविधांसाठी टोल कर आकारला जातो त्या सुविधा नागरिकांना मिळणे हा त्यांचा हक्क असून ह्यासाठी लढा देऊनही महामार्ग प्राधिकरणाला जाग येत नसल्यामुळे श्राद्ध घातल्यानंतर लाजेखातिर तरी महामार्गावरील सुविधा पूर्ववत करण्यात येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.