पालघर: समुद्र किनार्याजवळ व कमी खोलीच्या ठिकाणी माशांना प्रजनन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कृत्रिम भित्तिका (म्युरल) समुद्रात सोडण्याची योजना आखली आहे. या योजनेमध्ये सिमेंटच्या भित्तिका सोडणारी बोट सातपाटी समोरील खडकात अडकली. ठाणे जिल्ह्याच्या उत्तन व पालघर जिल्ह्याच्या वसई, अर्नाळा भागात कृत्रिम भित्तिका समुद्र तळावर सोडण्याचे काम केल्यानंतर ही बोट सातपाटीजवळ आली असता नौकानयन करणार्या तांडेलला खडकाचा अंदाज न आल्याने बोट खडकात अडकली. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. उधानाचे पाणी आल्यानंतर समुद्रात बोट पुन्हा सोडण्यात येईल असे सांगण्यात आले.
यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसंचालक दिनेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आठ ते दहा मीटर खोली असणार्या समुद्रतळावर कृत्रिम भित्तिका समुद्रव्रत सोडण्याची योजना असून या योजनेमध्ये अंतर्गत काम करणार्या बोटचालकाला सातपाटी जवळील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसल्याने बोट खडकात अडकल्याचे सांगितले. कृत्रिम भित्तिका समुद्र तळावर सोडण्याचे काम शासकीय योजनेअंतर्गत असून यामध्ये कोणताही घातपात झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.