मध्य वैतरणाला जोडणाऱ्या कडूची वाडी-कोचाळे रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीने खचली आहे. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यावर ठोस उपाय करण्याऐवजी खचलेल्या बाजूने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चुना लावून दगड ठेवले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अजब कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे. कडूची वाडी-कोचाळे हा मध्य वैतरणा जलाशयाकडे जाणारा अतिशय महत्वाचा रस्ता असून रस्त्यावरील मोरी गेल्या वर्षीच्या पावसात अर्धी वाहून गेली होती. त्या रस्त्यावर संरक्षण भिंतीची गरज असतानाही प्रशासन डोळे झाकून बसले आहे.
हा रस्ता इतका धोकादायक असताना त्या रस्त्यावर एकही सूचना फलक लावले नाहीत, यासाठी माजी सभापती प्रदीप वाघ यांनी वर्षभर पाठपुरावा करून दखील झोपी गेलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले होते. वाघ यांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर निर्ढावलेल्या बांधकाम विभागाने केवळ चुना लावण्याचे काम केल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याच्या कडेला छोटे दगड चुना लावून ठेवले आहेत. या दगडांनी अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे का?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात असून प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
कडूचीवाडी-कोचाळे रस्त्यावरच्या मोरीसाठी वर्षभरापासून सातत्याने पत्रव्यवहार आणि स्वतः भेटून बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली. तरी झोपी गेलेले प्रशासन जागी होत नाही. त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
– प्रदीप वाघ, माजी सभापती
या रस्त्यावरूनच कोचाळा, कडूचीवाडी या अतिदुर्गम गावातील नागरिकांची बारमाही रहदारी चालू असते. दळणवळणासाठी एकमेव असलेल्या या याच एकमेव मार्गावरुन स्वस्त धान्य, रॉकेल, किराणा, आरोग्य सेवा या नैमित्तिक आणि अत्यावश्यक गरजांबरोबरच मुंबई महापालिका यांचीही वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतू जनतेच्या संभाव्य हालअपेष्टांची काळजी न घेता केवळ चुना लावण्याचे काम केले असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.