पालघर: पालघर येथील बदली ड्राइव्हर म्हणून प्रवाशांना घेऊन पालघर येथून नाशिकच्या दिशेने निघालेला आसिफ घाची हा तरुण चार दिवसांपासून बेपत्ता होता.अखेर त्याचा मृतदेह मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी घाटात कुजलेल्या अवस्थेत मिळाला आहे. गळा दाबून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा खून वाहन भाड्यावर घेऊन जाणार्या प्रवाश्यांनीच गाडी चोरी करून नेण्यासाठी केला, असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक तपास मोखाडा पोलीस करीत आहे. चार दिवसांपूर्वी पालघर येथे बाहेरून आलेल्या काही प्रवाशांनी जुना पालघर येथून नाशिक येथे जाण्यासाठी एक मारुती अर्टिगा गाडी भाडे तत्वावर घेतली होती. गाडी मालक महेश यांनी आसिफ घाची नावाच्या बदली ड्रायव्हरला प्रवाशांना नाशिक येथे सोडण्यासाठी गाडी सोबत पाठवले होते. पालघर येथून निघाल्यानंतर रात्री गाडी मालकाने गाडी कुठपर्यंत पोचली हे जाणून घेण्यासाठी ड्रॉइव्हरला फोन लावला असता ड्रॉइव्हर आसिफ याचा फोन बंद आला.
नंतर गाडी मालकाला कळले की गाडी नाशिकऐवजी नाशिकच्या पुढे सिन्नर टोलनाका पार करून पुढे निघाली आहे. सिन्नर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांना कळले की गाडी आसिफ चालवत नसून कोण तरी दुसरा व्यक्ती गाडी चालवत आहे. त्यांनी लगेच आसिफ यांच्या घरच्यांना घेऊन पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालघर पोलीस शोधात असताना आसिफ याचा मृतदेह मोखाडा येथील मोरचोंडी घाटात मिळाला. याबाबत पालघर पोलिसांनी मोखाडा पोलिसांना कळवून मोखाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.या घटनेनंतर पालघरमधील बदली ड्रॉइव्हर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता वाहन प्रवाशांकडून भाडे तत्वावर घेताना ओळखपत्र घेण्याचे अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.