पूर्वीच्या काळात घरोघरी मातीच्या चुली वापरल्या जात असे. आधुनिक काळात घरोघरी गॅस शेगड्यांचा वापर सुरु झाल्याने मातींच्या चुलींची मागणी कमी झाली. त्यामुळे मातीच्या वस्तू बनविणाऱ्या या व्यवसायाला घरघर लागली. परंतु आधुनिक काळातदेखील लोकांना मातीच्या वस्तूंचे महत्व कळू लागल्याने याच वस्तूंकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला पुन्हा नवसंजीवनी मिळेल, अशी आशा उत्पादकांना वाटत आहे. शेकडो वर्षांपासून मातीचे माठ, चुली, चुलुंबे, पणत्या, सुगडे, लग्नविधीसाठीचे न्हाणे, बांडी, मडके इत्यादी वस्तू मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होता. परंतु आधुनिक काळात या वस्तू हद्दपार होताना दिसत होत्या. मात्र आधुनिकतेबरोबर लोखंडी, प्लास्टिक इत्यादी पासून बनविलेल्या वस्तूंमुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येवू लागल्याचे दिसू लागताच पुन्हा मातीच्या वस्तूंकडे माणसाचा कल वाढू लागल्याचे माती वस्तू निर्मिती व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
वडिलोपार्जित या व्यवसायावरच आमच्या कुटुंबियांचा उदर्निवाह होत असून हा व्यवसाय काही काळ लोप पावत चालला होता. मात्र आता पुन्हा या व्यवसायाला संजीवनी मिळेल, अशी आशा आहे.
– वर्षा चिरनेरकर, माती वस्तू व्यवसायिक, कुंभार आळी, वाडा
मातीच्या वस्तूचे महत्व माणसांना पटत चालल्याने तसेच चुलीवरच्या जेवणाची लज्जतही लोकांना भूरळ घालत असल्याने आज चुलींनाही मागणी वाढत आहे. कुणबी तसेच आगरी समाजात लग्नसमारंभातही चुलीची आवश्यकता भासत असते. मातीच्या चुली सध्या २५० ते ३०० रुपये तर चुलुंबा १०० ते १५० रुपये या दराने विकल्या जात असे.
हेही वाचा –
तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा