भाईंदर :- ठिकाण भाईंदर पोलीस स्टेशन.वेळ संध्याकाळची.आकाश गुप्ता या तरूणाने संपर्क केला.मी रेल्वे पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या करणार असून माझा मृतदेह माझ्या घरच्यांना द्या.या तरूणाच्या अशा संपर्कानंतर भाईंदर पोलिसांनी चक्रे फिरवली. भाईंदर पोलिसांनी लगेच दोन नंबर रेल्वे पूल नवघर हद्दीत असल्याने त्याची माहिती नवघर पोलिसांना दिली. सदरील घटनेची माहिती मिळताच ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे, पोलीस अंमलदार सूर्यकांत केंद्रे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान दिनेश भदाणे व स्थानिक मच्छीमार देवा यांची एक टीम खाडीच्या दिशेने निघाली. रविवारी संध्याकाळी 5 वाजता ही टीम बोट घेऊन जागेवर जात असतानाच आकाशने खाडीत उडी मारली.पोलिसांच्या आणि मच्छिमारांच्या या टीमने आकाशला मोठ्या तत्परतेने वाचवले आणि त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. सदरील युवकाचे लग्न होऊन अवघे २० दिवस झाले होते. आपण कौटुंबिक मानसिक तणाव आणि आर्थिक चणचण असल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्याने सांगितले होते. मुलाचा जीव वाचवल्याबद्दल मुलाच्या घरच्यांनी मच्छीमार बांधव आणि नवघर पोलिसांचे आभार मानले आहेत.