घरपालघरवाडा-मनोर महामार्गाचे काम 20 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत

वाडा-मनोर महामार्गाचे काम 20 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत

Subscribe

अडथळा ठरणार्‍या वनविभागाच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी यश न आल्याने आज 20 वर्षांनंतरही या महामार्गावर सात ते आठ ठिकाणी वनजमीन असलेल्या सात किलोमीटर अंतरामध्ये आजही रस्ता अपूर्ण अवस्थेत राहिला आहे.

वाडा: दि.२१ ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांना तसेच मुंबई-आग्रा व मुंबई-अहमदाबाद या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा भिवंडी-वाडा-मनोर हा अत्यंत महत्त्वाचा व रहदारीचा राज्य महामार्ग वनविभागाच्या हरकतींमुळे गेल्या 20 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या महामार्गावर नेहेमीच अपघात घडत आहेत. या महामार्गाकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असतानाही कुणीही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व पक्षीय पुढारी बोलायला तयार नाहीत. यामुळे गेल्या 20 वर्षांपासून हा महामार्ग दुरावस्थेत राहिला आहे. सन 2003 मध्ये भिवंडी-वाडा-मनोर या 64 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला देण्यात आले. या महामार्गाच्या चौपदरी करणात येणारी खासगी जमीन, घरे तसेच सरकारी मालमत्ता संपादन करण्यासाठी येणारा खर्चही या कामाच्या अंदाजपत्रकात गृहित धरण्यात आला होता. असे असतानाही संबंधित ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याच्या चौपदरी करणालाअडथळा ठरणार्‍या वनविभागाच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी यश न आल्याने आज 20 वर्षांनंतरही या महामार्गावर सात ते आठ ठिकाणी वनजमीन असलेल्या सात किलोमीटर अंतरामध्ये आजही रस्ता अपूर्ण अवस्थेत राहिला आहे.

या महामार्गाच्या वाडा-मनोर या 24 किलोमीटर लांबीच्या टप्प्यात पाच ठिकाणी वनजमिनीचे टप्पे आहेत. या पाचही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत. आजवर या मार्गावर झालेल्या अपघातामधील 70 टक्के अपघात रस्ता अपूर्ण असलेल्या ठिकाणीच झाले आहेत. वाडा-मनोर या दरम्यान पिंजाळी नदीवर पाली येथील पुलाचे काम गेल्या 15 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. या ठिकाणी दुपदरीच रस्ता असल्याने हा भाग नेहमीच अपघाताला निमंत्रण ठरला आहे. गेल्या 15 वर्षात या ठिकाणी 30 ते 35 अपघात झाले असून या अपघातात अनेक बळी गेले आहेत. देहेर्जे नदीवर करळगांव येथे याच महामार्गावरील पुलाचे काम 15 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. वन विभागाने या पुलाच्या कामाला हरकत घेतल्याने हे काम रखडले आहे. या पुलासाठी वापरण्यात आलेले लोखंड गेल्या 15 वर्षांपासून उघड्यावर असल्याने त्याला गंज लागला आहे. तसेच अर्धवट अवस्थेत असलेले हे पूल कमकुवत बनले आहे. सध्या पाली व करळगांव या दोन्ही ठिकाणी जुन्या पुलावरुनच एकेरी वाहतूक सुरु असून हे जुने पूलही धोकादायक आहे. तसेच भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामात संपादन केली गेलेल्या वन जमिनीच्या बदल्यात वनविभागाला रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर येथे जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खरेदी करुन देण्यात आली आहे. मात्र याबाबतीत जी आवश्यक असणारी कागदपत्रे अजूनही वनविभागाकडे मिळाली नाहीत असे वनविभागातील एका जबाबदार अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

या महामार्गाचे अंदाजपत्रक बनविण्यापासून ते कामाला प्रत्यक्ष सुरवात होईपर्यंत या कामावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांचे नियंत्रण होते. त्यानंतर हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसई यांच्याकडे देखरेखीसाठी सोपविण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडी यांच्या देखरेखीखाली आहे. या तीन उपविभागाच्या नियंत्रणात सापडलेला हा महामार्ग आजही दुरवस्थेचीच वाट चालत आहे. भिवंडी येथील उप अभियंता शशिकांत चौधरी यांच्याशी या बाबतीत विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वनजमिनी संदर्भातील परवानगीचे कागदपत्रे मिळविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत ते मार्गी लागेल.
अनिल पवार – शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भिवंडी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -