भाईंदर : मीरा- भाईंदरमध्ये डायमंड बनविणार्या टोरेस या खासगी कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आमीष दाखवत लाखो रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदेव पार्क परिसरात टोरस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनीने नागरिकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करत गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.
मुंबईसह भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क येथे टोरेस नावाच्या कंपनीने काही महिन्यांपूर्वी ऑफिस सुरू केले होते. या कंपनीने गुंतवणूक दारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची ऑफर दिली होती. त्यांच्या गुंतवणुकीवर आठवड्याला ठराविक टक्केवारीने रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. या झटपट पैसा मिळण्याच्या या अमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. काहींना काही महिने पैसे मिळाले. तर काही गुंतवणूक दारांना काहीच पैसे मिळाले नाहीत.
सोमवारी सकाळी कंपनीचे दादर येथील मुख्य कार्यालय आणि भाईंदर येथील शोरूम अचानक बंद झाल्याची गुंतवणूकदारांना माहिती मिळताच आपल्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी लोकांनी शोरूम बाहेर मोठी गर्दी केली. मात्र, शोरूम बंद असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. मीरा- भाईंदर परिसरातील हजारो गुंतवणूकदारांनी टोरस कंपनीत गुंतवणूक केली असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची जमा पुंजी या योजनांमध्ये गुंतवली आहे. कंपनीच्या फसवणुकीमुळे या सर्व गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शोरूम बाहेर काहींनी निदर्शने केली. तर काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या आहेत.
मीरा- भाईंदर पोलिसांनी याबाबत गुंतवणूकदारांकडून तक्रारी घेण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून कंपनीच्या मालक आणि संचालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या फसवणुकीमुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. लोकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी, निवृत्तीचे पैसे आणि उधारीचे पैसे घेवून या कंपनीत गुंतवले होते. आता या प्रकरणामुळे आर्थिक नुकसान झालेल्या नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. लोकांनी पोलिसांकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून कंपनीच्या मालमत्तेचा शोध घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत आणि विश्वासार्ह संस्थांमध्येच गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर याप्रकरणी फसवणूक झालेल्या राहिला सय्यद यांनी कठोरात कठोर कारवाई करून गोर गरिबांचे फसवणूक झालेले पैसे परत देऊन सदरील प्रकरणाची सक्त वसुली संचनालयाकडे किंवा केंद्रीय गुन्हे अन्व्हेशन विभागाकडून चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.