डहाणू: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे बाजूने गुजरातच्या दिशेला दुचाकीस्वारांचे ताफे भरधाव वेगात प्रवास करत असतात. बेशिस्तपणे भरधाव वेगात वाहने पळवणारे दुचाकी स्वार महामार्गावर कसरती करत वाहने हाकतात. यामुळे अनेक वेळा अपघात होत असून बाईक स्वारांचा बेशिस्तपणा इतर वाहनचालकांच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात भरधाव वेगात प्रवास करणार्या साधारण 10 ते 12 दुचाकी स्वारांचे अपघात झाले असून यात सात ते आठ दुचाकी स्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मेंढवण घाट, चारोटी आणि धानीवरी येथे दुचाकी स्वारांचे अपघात जास्त प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दोनही ठिकाणी तीव्र वळणे आणि उतार असून दुचाकी स्वार भरधाव वेगात येत असल्यामुळे नियंत्रण सुटून त्यांचे अपघात होत आहेत. चारोटी उड्डाणपूल, घोळ पुल येथील पुलावरून खाली पडून दोन दुचाकीस्वारांना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर मेंढवण घाटात अनेक वेळा अपघात होऊन दुचाकीस्वारांना मृत्यू झाल्याची घटना समोर आल्या आहेत. त्याच बरोबर धानिवरी येथे दोन दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू झाले होते. महामार्गावर बेशिस्तपणे भरधाव वेगात गाड्या हाकणार्या दुचाकीस्वारांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी महामार्ग पोलिसांकडून खानीवडे टोल नाका येथे दुचाकीस्वारांना थांबवून पुष्पगुच्छ देऊन समज देण्यात आली होती. वर्षभरापूर्वी कासा पोलिसांकडून आंबोली येथे बाईक स्वारांची भेट घेऊन त्यांना समज देऊन वाहने हळू चालवण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर काही काळ दुचाकीस्वारांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा महामार्गावर भरधाव वेगात दुचाकी येणे सुरू झाले आहे.