मोखाडा तालुक्यातील विविध सरकारी विभागातील महत्वाची अनेक पदे रिक्त असल्याने तालुक्यातील सरकारी कारभार विस्कळीत झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. पूर्वीच्या ठाणे आणि आताच्या पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून मोखाडा तालुक्याकडे पाहिले जाते. आदिवासीबहुल तालुक्यात आजही कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यु, पाणीटंचाई रोजगारासाठी स्थलांतर, असे अनेक ज्वलंत प्रश्न आजही गंभीर आहेत. विकासाची गंगा आदिवासींच्या झोपडीपर्यंत जावी. यासाठी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या आधीही जव्हारला उपजिल्हाचा दर्जा देण्यात आला होता. पण, आपल्या मुलभूत गरजांसाठी आदिवासींना आजही झगडावे लागत आहे.
विविध सरकारी कार्यालयात आजही महत्वाची अनेक पदे रिक्त असल्याने विकासाची गंगा अद्याप मोखाड्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही. तहसिल कार्यालयातील महसूल आणि संजय गाधी निराधार विभागातील नायब तहसिलदार पद रिक्त आहे. या महत्वाच्या पदाचा कार्यभार दुसर्या अधिकार्यावर सोपवण्यात आला आहे.
महसूल सहाय्यक (लिपीक) ची १३ पदे मंजूर असताना पाच पदे रिक्त आहे. शिपायांच्या पाचपैकी तीन पदे रिक्त आहेत. तलाठ्यांची १० पैकी तलाठ्यांची पाच पदे रिक्त आहेत. एकेका तलाठ्यांकडे दोन-तीन कार्यालयाच्या कार्यभार देण्यात आला आहे. २७ ग्रामपंचायती हद्दीतील कामकाज फक्त पाच तलाठी काम करत आहेत. तसेच कोतवालाची दहा पदे असताना सहाच पदे भरली गेली आहेत. पाहरेकरी, स्वच्छकाची एकेक पदे रिक्त आहेत.
(ज्ञानेश्वर पालवे – हे मोखाडाचे वार्ताहर आहेत.)