वसई : वसई -विरार महापालिकेने पाणी पथक स्थापन केले आहे. यामध्ये पालिका अभियंता आणि कर्मचारी दर आठवड्यात प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी करणार आहेत. आमदार स्नेहा पंडित-दुबे यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठकीत याबाबत खडसावले होते.
वसई- विरार महापालिकेतर्फे शहरातील नागरिकांना सुर्या पाणी प्रकल्प, उसगाव आणि पेल्हार धरणातून दररोज पाणी पुरवठा केला जातो. शहराची व्याप्ती वाढत असून लोकसंख्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी सतत वाढत असते. त्यामुळे टँकर लॉबी देखील शहरात सक्रीय आहे. पाण्याची मागणी वाढत असल्याने नळजोडणीत, पाणी वाटपात गैरप्रकार आणि अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सतत होत असतात. अनेक भागांना अद्याप पाणी मिळालेले नाही. ज्यांना पाणी मिळते ते कमी दाबाने मिळत असल्याने पाणी टंचाईची समस्या कायम भेडसावत असते. यासाठी सर्वांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे अशी मागणी करण्यात येत होती. या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वसईच्या आमदार स्नेहा पंडित-दुबे यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकार्यांना खडसावले होते आणि पाणी समिती तयार करण्याची सूचना केली होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार पालिकेने प्रभागनिहाय पाणी पथक तयार केले आहे. त्यात अभियंता आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. हे पथक दर आठवड्याला आपापल्या प्रभागात भेट देऊन पाणी वितरणाचा आढावा घेणार आहे. हे पथक पाणी वाटप समान कसे होईल त्यावर भर देणार आहे. बेकादेशीर नळ जोडणीचा तपास करण्यात येईल, कमी दाबाने पाणी जात असेल तर त्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येतील. नळ जोडण्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करून ते प्राधान्याने देण्यात येणार आहेत.