वसईः पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम उत्तर कोकणासह होणार असून येत्या ४ ते ६ मार्च दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे दक्षिण मध्य प्रदेश व गुजरात आणि उत्तर कोकणावरही याचा परिणाम होणार असून ४ ते ६ मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात दिनांक ४ ते ६ मार्च,२०२३ दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची संभावना असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती कोसबाड हिल कृषि विज्ञान केंद्रातील कृषि हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.
1) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी अवस्थेत असलेल्या हरभरा, वाल व चवळी आदी रब्बी पिकाची शेतकर्यांनी पुढील दोन दिवसात काढणी करून घ्यावी.
2) कमाल तापमान जास्त असल्याने कडधान्य पिकाच्या शेंगा तडकू शकतात. त्यामुळे पिकांची काढणी सकाळच्या वेळेस करावी.
3) त्याचबरोबर परिपक्व झालेला भाजीपाला व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
4) तापमाणात वाढ होत असल्याने जनावरे व कोंबड्याचे वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्याचा सल्ला कोसबाड हिल कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव दिला आहे.