नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारपासून (21 सप्टेंबर) पावसाची सततधार सुरू असून आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून सखल भागात पाणी शिरल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी पोहचले असून आतापर्यंत सुमारे 500 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. (PHOTO Flood like situation in Nagpur due to heavy rain So far 500 people have been rescued)
नागपुरात शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहत असून काही भागात पाणी शिरले आहे. आज अवघ्या 4 तासात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सखल भागाता पाणी शिरले आहे.
शहर व जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा व महानगर) जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.
मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले असून बससुद्धा रस्त्याच्या मधोमध बंद आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून, आवश्यक ती पावले तातडीने उचलण्यात येत आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना प्रथम मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नागपूरमध्ये पुराचे पाणी सखल भागात साचल्यामुळे लोकांना आपले घरे सोडावे लागले आहे.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागपुरातील अनेक बाजारपेठा आज बंद असल्याचे पाहायला मिळाले.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचावकार्य नागपूरमध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्याला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत त्यांना सुमारे 500 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मदत आणि बचावासाठी लष्कराच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.