ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हे शाब्दिक राजकारण आता सर्वश्रुत झाले आहे. ठाकरे गटाकडून एखादे वक्तव्य करण्यात आले की, त्याला शिंदे गटाकडून प्रतिऊत्तर हे दिले जातेच. पण आता ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्याने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिल्यानंतर शिंदे गटातील मंत्र्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.
शिंदे गटातील मंत्र्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की, ”माझ्या विधानावरून भरपूर चर्चा झाली आहे. सोशल मीडियावरही हाच विषय चालू होता. एक नक्की… हिला दिया. इतक्या सगळ्यांनी ट्विट करण्यापेक्षा स्वतः सांगितलं असतं की, लढायची ताकद नाहीये, हिंमत नाहीये, तरी चालले असते.” असे म्हणतं आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा चिमटा काढण्यात आला आहे.
हेही वाचा – कसबा पोटनिवडणूक बिनविरोधात! वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, बावनकुळेंचं सूचक विधान
शिंदे गटाकडून ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना गळाला लावण्याचे काम सुरु आहे. नुकतेच संतोष खरात या वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने शिंदे गटामध्ये प्रवेश केला. तसेच इतर भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये प्रवेश करत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत. याचमुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर उभे राहण्याचे आव्हान केले आहे.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एका आमदाराने चॅलेंज दिल्यावर काहीजण असे हडबडलेत की, अख्खा गद्दार गट, त्यांच्या मित्रपक्षातले नेते आणि ‘आयटी सेल्स’ लगेच मला शिव्या देऊ लागले आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 5, 2023
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता. 7 फेब्रुवारी) वरळीमध्ये एका सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी ते याबाबत काही बोलतात की नाही याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून याबाबत ट्विट देखील करण्यात आले आहे. या ट्विटमधून देखील त्यांनी शिंदे गटाला लक्ष केले आहे.