एकीकडे राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याचे म्हटले जात असताना, आता राज्याच्या राजकारणातून मात्र मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि भाजपचे वरिष्ठ आणि केंद्रीय नेते विनोद तावडे मात्र राज्याच्या राजकारणात मला अजिबात स्वारस्य नाही, असे म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नो महाराष्ट्र, ओनली राष्ट्र, असे विनोद तावडे म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवरदेखील भाष्य केले आहे.
आता राष्ट्र, नो महाराष्ट्र
राज्यातील भाजपचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सुरु आहे. राज्यातील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांची चांगली टीम आहे. त्यामुळे इकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा कधी राज्याला माझी गरज लागली तर नक्की मदत करेन, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे.
( हेही वाचा: आता पुन्हा सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत )
राज्यातील भाजपमध्ये दोन गट नाहीत
मी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गट तयार करतो, यात अजिबात तथ्य नाही. आमच्यात अजिबात दोन गट नाहीत आणि मी हे अगदी मनापासून सांगतो. महाराष्ट्रात भाजप पक्ष कसा मोठा होईल, यासाठीच सगळे मिळून काम करत असतात, असे मत मांडत देवेंद्र फडणवीस आणि माझ्य़ात मतभेद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी राष्ट्रीय राजकारणात- पंकजा मुंडे
मी राष्ट्रीय सचिव आहे. मी राष्ट्राच्या राजकारणात असते. त्यामुळे मी राज्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत नाही,असे वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यापूर्वी केले आहे.