ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मंगळवारी रात्री वैजापूर येथील सभा संपल्यानंतर काही अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापले आहे. तर राजकीय नेत्यांकडून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी या घटनेचे पत्र पोलीस महासंचालकांना पाठवले असून यावर आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी या घटनेसाठी शिंदे गटाच्या आमदाराला जबाबदार ठरवले आहे. याबाबत बोलताना खैरे म्हणाले की, ‘पोलिसांनी काहीच सहकार्य केले नाही. मी पोलिसांना सांगितले की, शांतता ठेवा. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले असून, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही सतर्क होतो. पुढे काही झाले असते तर आम्ही काही शांत बसलो असतो का?’ आदित्य ठाकरे गेल्यावर कधी ना कधी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना उत्तर देणार आहे. ‘पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा’ अशी संतप्त प्रतिक्रिया खैरेंकडून प्रसार माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी या सर्व घटनेसाठी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना जबाबदार ठरवले आहे. रमेश बोरनारे हे शिंदे गटातील वैजापूरचे आमदार आहेत. ‘आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात जो काही गोंधळ झाला आहे, तो शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच घडवून आणला आहे. लांब बसून बोरनारे यांनी हे कारनामे केले असून, समोर असते तर त्यांना उत्तर दिले असते. सर्व काही सुरळीत असतान मुद्दाम काही लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर शिवशक्ती आणि भीमशक्ती होऊ नये, म्हणून हे सर्व करण्यात आल्याचा थेट आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार रमेश बोरनारे यांनी काही लोकांना जाणीवपूर्वक दारू पाजून या कार्यक्रमात पाठवले होते. त्यानंतर या लोकांनी याठिकाणी येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पण याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा चंद्रकांत खैरेंनी यावेळी केला. मी स्वतः पोलीस महासंचालक यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असताना अशा घटना घडत आहे. त्यांच्या सुरक्षेतील पाच पोलीस तर गाडी खाली उतरलेच नसल्याचे पाहायला मिळत होते, अशी माहिती देखील खैरेंकडून यावेळी प्रसार माध्यमांना देण्यात आली.