मुंबई : महाविकास आघाडी सरकार गडगडल्यानंतर आघाडीतील शिवसेनेसह अन्य बंडखोरांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. याची सर्वांना खात्री होती. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आज विधानसभा अध्यक्षपद जिंकणारे राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झाले आहेत. त्यावरून काँग्रेसने हे भाजपाचे आऊटसोर्सिंग असल्याची टीका केली आहे.
आउटसोर्स मुख्यमंत्री, आउटसोर्स विधानसभा अध्यक्ष, आउटसोर्स विधानपरिषद विरोधीपक्षनेते असा सगळा कारभार आहे. भाजप मधल्या निष्ठावंतांना शुभेच्छा!!!
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांचे मनापासून अभिनंदन. #Maharashtra #AssemblySpeaker— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 3, 2022
राहुल नार्वेकरांची राजकारणातील सुरूवात शिवसेनेतून झाली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत ट्विटरवरून टीका केली आहे. आऊटसोर्स मुख्यमंत्री, आऊटसोर्स विधानसभा अध्यक्ष, आऊटसोर्स विधान परिषद विरोधीपक्षनेते असा सगळा कारभार आहे, असे म्हणत, भाजपमधील निष्ठावंतांना शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – आम्हाला त्यांची नैतिक टेस्ट घ्यायची होती – आदित्य ठाकरे
राष्ट्रवादीकडूनही कोपरखळ्या
विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांकडे पाहतो तेव्हा भाजपाचे कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त दिसतात. आमची मंडळी तर मूळ मान्यवरांना बाजूला सारून बसले आहेत. तिकडे बसलेल्या आमच्या मंडळींना बघून मूळ भाजपाच्या मंडळींचे वाईट वाटते, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मारली. ते सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलत होते.
हेही वाचा – आरे कारशेडसाठी नव्याने वृक्ष कत्तलींची गरज नाही, फडणवीसांचा दावा