घरराजकारण... तर 'सावरकर गौरव' यात्रेचे नक्की स्वागत करु; भाजप- शिवसेनेवर खासदार अमोल...

… तर ‘सावरकर गौरव’ यात्रेचे नक्की स्वागत करु; भाजप- शिवसेनेवर खासदार अमोल कोल्हेंचा निशाणा

Subscribe

जर सावरकर गौरव यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर अशी यात्रा नक्कीच काढावी, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसले. राज्यातील वातावरण तर ढवळून निघाले आहे. भाजप- काॅंग्रेस ठिकठिकाणी मोर्चे काढत आहे. अशातच भाजप- शिवसेनेने सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील माहिती देण्यासाठी 30 मार्चपासून राज्यातील 288 मतदार संघात ‘सावरकर गौरव’ यात्रा काढण्याची घोषणा केली. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र डागले आहे. सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील तर आम्ही या यात्रेचे स्वागत करु, असे कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोल्हे म्हणाले.

काय म्हणाले अमोल कोल्हे ?

मागच्या अधिवेशनात मी काही प्रश्न मोदी सरकारला विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही देशाला मिळालेली नाहीत. जर सावरकर गौरव यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर अशी यात्रा नक्कीच काढावी, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. सावरकरांच्या साहित्याचा जागर हा प्रत्येकाने करायला हवा. प्रत्येकाच्या मनात सावरकरांविषयी आदर असावा. सावरकर गौरव यात्रा काढल्याने त्यांच्या साहित्याचा जागर होईल, पण या यात्रेने राहुल गांधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर त्या यात्रेचे नक्कीच स्वागत करु, असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

काळं पाणी या पुस्तकाने साहित्य वाचनाची सुरुवात

प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आदर आहे आणि तो असणे स्वाभाविक आहे. आपल्या साहित्य वाचनाची सुरुवात काळं पाणी या पुस्तकाने झाली आहे. सावरकर हे अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिले आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

शिंदे सरकार सावरकर गौरव यात्रा काढते. मात्र, भगतसिंग कोश्यारींनी जेव्हा महापुरुषांचा अपमान केला तेव्हा मात्र अशी यात्रा काढली नाही. अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबाबत विचारले असता, जेव्हा महापुरुषांचा अपमान झाला, तेव्हा आम्ही त्याचा कठोर शब्दांत निषेध केला. खर तर कोणत्याही महापुरुषांचा राजकीय वापर केल्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -