मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी, शिवाजी पार्क येथे शिवतार्थावर घेतलेल्या सभेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी माहिमच्या खाडीत नवीन हाजी अली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा केला आणि त्याबाबत एका महिन्यात कारवाई करण्याचे अल्टिमेटमही सरकारला दिले. त्यानंतर यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. त्यावरुन आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत हे प्रकरण म्हणजे ‘मॅच फिक्सींग’ आहे असा आरोप केला आहे.
राज ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या सभेत माहिम येथे अनधिकृत मजार असल्याचे म्हटले होते. तसेच, माहिमच्या खाडीत नवीन हाजीअली तयार होत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी हे सगळं मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलं आहे. आव्हाड यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर ट्वीट करत सरकारवर हा आरोप केला आहे. हे सगळं मॅच फिक्सिंग आहे. इतक्या उघडपणे हे सुरु आहे. मुंबईकर हुशार आहेत. माहिमच्या मजारीबाबत आधीच सगळं टाईप करुन ठेवण्यात आले होते. केवळ, तारीख टाकायची बाकी होती. 2007 सालीच ही बातमी पहिल्या पानावर छापून आल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Match Fixing … इतक्या उघड पणानी .. मुंबईकर हुशार आहेत …बाकी सगळे टाइप करुन ठेवले होते तारीख फक्त टाकायची होती
२००७ मध्ये ही बातमी पहिल्या पानावर छापून आली होती …#MatchFixing pic.twitter.com/A1Sp2dy3Oz— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 23, 2023
दैनिक सामनामध्ये 16 वर्षांपूर्वीच माहिमच्या मजारीविषयी बातमी छापून आली होती. 19 ऑगस्ट 2007 रोजी ही बातमी या वृत्तपानावर छापली होती. ‘माहिमच्या समुद्रावर हिरवा झेंडा’ अशा मथळ्याखाली सामनात ही बातमी होती. माहीमच्या खाडीत हजरत ख्वाजा खिज्र हयातून नबी चिल्ला या ट्रस्टला अवघ्या दोन दिवसांत वफ्फ बोर्डाने माहीमच्या भरसमुद्रात परवानगी दिली आहे. त्यामुळे या ट्रस्टने समुद्रात हिरवा झेंडा फडकावला असल्याचे दैनिक सामनाच्या बातमीत म्हटले होते. तसेच, हा हिरवा झेंडा समुद्रात फडकवल्याचा फोटोही छापण्यात आला होता.
( हेही वाचा:Live Maharashtra Assembly Budget : राहुल गांधी तुरुंगात राहतील पण माफी मागणार नाहीत- जितेंद्र आव्हाड )
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा बुधवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे झाला. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांतच कारवाई करण्यात आली. राज ठाकरे यांनी एका महिन्यात माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम पाडा, नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू, असा इशारा दिला होता.