मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपाच्या राहुल नार्वेकर यांनी जिंकली. पण त्याआधी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या राजकारणावरून भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी टीका केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्याबद्दल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील 39 आमदारांनी बंड पुकारल्याने पक्षात उभी फूट पडली. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आला. आता त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सेनेतील या अंतर्गत कलहामुळे विधिमंडळ कार्यालय आज बंद ठेवण्यात आले आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले होते.
हेही वाचा – नार्वेकर विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर किती दिवस बसणार? सुनील प्रभूंचा सवाल
यावरून निलेश राणे यांनी ट्वीट करत, एक टोयोटा इनोव्हा गाडीत बसू शकणारे उद्धव ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना बसण्याची पण सोय नाही. इकडे तिकडे जागा शोधून बसले… उरली सुरली लाज घालवली, अशी टीका केली आहे. सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर पुरुषार्थ दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर जाऊन विधिमंडळाचे शिवसेना पक्ष कार्यालय उघडून दाखवावे, असे आवाहनही दिले आहे.
हेही वाचा – तुम्हीच जावयाची काळजी घ्या, निवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांचा पलटवार