जालन्यात 1 सप्टेंबरला मराठा क्रांती मोर्चात पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ आता मराठा समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं केली. तसंच, आता यावर विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आधी आंदोलकांनी दगडफेक केली मग लाठीचार्ज केला गेला असं सांगितलं जात आहे. यावर फडणवीस ‘एसी’ त बसून बोलू नका, घटनास्थळी जा, माहिती घ्या नाहीतर राजीनामा द्या, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. (Rohit Pawar asked for Devendra Fadnavis Resignation on Maratha Morcha case Jalana)
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, पोलिसांनी पहिला लाठीहल्ला केला. महिला व लहान मुलांनाही बेदम मारहाण केली, यात महिलाही जखमी झाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी केवळ एसी मध्ये बसून वक्तव्य करून नयेत. तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. सत्यता तपासावी आणि मग आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी येऊन करायचं काय?
महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देण्यात काही अर्थ नाही. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी येऊन करायचं काय? असा सवाल आहे. लाठीकाठी घेऊन शासन नेमकं काम कोणासाठी करतं. सरकार बिल्डरसाठी काम करताना दिसत आहे. या जनतेसाठी नाही. तसंच, जालन्यात जो मराठा समाजावर लाठीचार्ज झाला तो मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊच शकत नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला आहे. आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, मी दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. इतकी संवेदनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही, असं होऊ शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाहीत. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर सरकार राजीनामा देईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा: लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी का? मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज नाहीच; आदित्य ठाकरेंचा घणाघात )