मुंबईः बंड करण्यासाठी कोणीही आम्हाला फूस लावली नाही. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका. आमच्या बंडाचं मुर्खासारख क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही, असे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत फूट पाडण्याचे भाजपचे मिशन होते व यशस्वीरित्या आम्ही ते पार पाडले, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी केले. यावरुन ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणाही साधला. भाजपचे सत्य बाहेर आले. आम्ही महाविकास आघाडीला कंटाळलो. शरद पवार व राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, हे शिंदे गटाचे दावे भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी खोटे ठरवले आहेत, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
यावर संजय गायकवाड म्हणाले, आम्हाला वर्षा व मातोश्री बंगल्यावर प्रवेश नव्हता. सर्व आमदार त्रस्त झाले होते. कामासाठी बैठका होत नव्हत्या. काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसची कामे जोरात सुरु होती. या दोन पक्षांसोबत आमचा संघर्ष सुरु होता. अनकेवेळा उद्धव ठाकरे यांना या संघर्षाची माहिती दिली. अनेक तक्रारी केल्या. उद्धव ठाकरे यांनी याकडे दुर्लक्ष केले. शेवटी आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला. तरीही उद्धव ठाकरे यांनी आमदार सोडले, मुख्यमंत्री पद सोडले पण काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसला सोडले नाही, असे संजय गायकवाड यांंनी सांगितले.
काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत संघर्ष सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना मदत केली. राज्यसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना चुकीची वागणूक मिळाली. त्यामुळेच आम्ही अंगावरच्या कपड्यांवर बाहेर पडलो. कोणी भूलवले आणि बंड केले नाही. आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलो. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नव्हती. आम्हाल सन्मान हवा होता. भाजपसोबत युती हवी होती, म्हणूनच आम्ही बाहेर पडलो, असे संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.