मुंबई : जूनमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर दोनच महिन्यात बिहारमध्येही सत्तांतर झाले. दोन्हीकडे भाजपाच्या भूमिकेवरचे टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही, भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवते, अशी टीका केली.
आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांनी केला आणि काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपाने हा आरोप फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केल्यामुळे बिहारच्या निवडणुका जिंकू शकलो, असे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. तुम्हाला ४३ जागा मिळालेल्या असतानाही आणइ भाजपाला तुमच्यापेक्षा दुप्पट जागा मिळाल्या असतानाही तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तथापि, शरद पवार यांनी देखील भाजपावर शरसंधान केले आहे. भाजपा हा मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. नितीश कुमार यांचीही हीच तक्रार होती. महाराष्ट्रातही हेच पाहायला मिळाले. इतकी वर्ष एकत्र राहिलेलल्या शिवसेनेची अवस्था तशीच केली आहे. दुही निर्माण करून हा पक्ष दुबळा कसा करता येईल, याची आखणी भाजपाने केली आणि त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांनी साथ दिली. अशा रीतीने भाजपाने शिवसेनेवर आघात केला, अशी टीका त्यांनी केली.
वादाला नड्डा यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी
नितीश कुमार यांनी केलेल्या आरोपाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या एका वक्तव्यावरून पुष्टी मिळते. देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यापूर्वी केला होता. त्याच्याच अनुषंगाने आता भाजपा लक्ष्य ठरलेला आहे.
शिवसेनेची टीका
शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात. दुसरे म्हणजे संपूर्ण जग नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्त्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेलेल जे.पी.नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? असा सवाल शिवसेनेने केला होता.