मुंबई : महारा्ष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या सुमारे तासभर केलेल्या भाषणात शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला. त्यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे हे भाजपाची तळी उचलत असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
मुंबईत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. मनसेने हाती घेतलेली विविध आंदोलने कशी यशस्वी केली, याची माहिती दिली. तर, राज्यातली सध्याच्या सत्तासंघर्षावर देखील त्यांनी टिप्पणी केली. राज्यात 2019मध्ये शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवली. पण अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपाने पाळला नाही, असे सांगत ठाकरे यांनी भाजपाशी फारकत घेतली. पण मला आठवते, पूर्वी बैठका व्हायच्या. तेव्हाच ठरले होते की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. ही गोष्ट ठरलेली असताना 2019ला मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता? असा सवाल त्यांनी केला.
त्या निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, राज्यात पुन्हा सत्ता येईल. तेव्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. त्या भाषणाच्या वेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरेही उपस्थित होते. नंतर केंद्रीय मंत्री अमित शहांनीही भाषणातून तेच सांगितले. तेव्हा ठाकरेंनी आक्षेप का घेतला नाही? सगळे निकाल लागल्यानंतर तुम्हाला आठवलं का?” असा जळजळीत सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
त्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. ‘भाजपाचे प्रवक्ते’ राज ठाकरे यांनी जी काही वक्तव्य केली आहेत, त्यावरून असे लक्षात येते की ईडीच्या नोटिसीच्या आधी आणि नंतर यात फरक स्पष्ट दिसतो. राज ठाकरे केवळ भाजपाची तळी उचलत आहेत. भाजपाने दिलेले स्क्रिप्ट वाचून दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ते पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण वास्तवात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत. असे दानवे म्हणाले.