गेल्या काही महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घटनांमुळे सामान्य माणसाला तरी वेड लागायची वेळ आली आहे. कोणता आमदार-खासदार किंवा नेता कोणासोबत जाईल, सांगता येत नसल्याने याकडे सामान्य माणसांनी तरी कानाडोळा केल्याचेच पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
मागील वर्षी महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. महाविकास आघाडीची तीन चाकांवर चालणारी गाडी सुरळीत सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी त्या गाडीला मध्येच ब्रेक मारला. त्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना घटक पक्षातील (तेव्हाची ठाकरेंची शिवसेना) ४०+१० अपक्ष अशा ५० आमदारांना घेऊन भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. पण या राजकीय घटनेमुळे राज्यातील सामान्य नागरिक मात्र चांगलाच वैतागला असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी आता राज्यातील राजकारणाकडे कानाडोळा केला असल्याचेच दिसून येत आहे. पण आज (ता. ३१ मार्च) शिवसेना (शिंदे गट) आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांची भेट घेण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आणि डॉ. प्रा. प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याची माहिती उदय सामंत यांनी त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. पण या भेटीचे खरे कारण अद्यापही समोर आलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. भरतशेठ गोगावले, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते pic.twitter.com/6eZi2Cwo55
— Uday Samant (@samant_uday) March 31, 2023
राजकारणात कोण कधी कोणाचा शत्रू होईल आणि मित्र होईल, याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. त्यामुळे राजकारणात घडणाऱ्या अनेक घटना या अनपेक्षित अशा असतात. पण आज झालेली शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामधील भेट राजकारणात काही नवी समीकरणे तयार करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय, रेडीरेकनरच्या दरात वाढ नाही