घरराजकारणउद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची धडपड, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची...

उद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची धडपड, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Subscribe

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याखेरीज स्वकर्तृत्वाच्या बळावर ज्यांना पक्ष वाढविता येत नाही, असे उद्धव ठाकरे आता लोकशाही वाचविण्याचा बहाणा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मिळेल त्याला हाताशी धरून उरलासुरला पक्ष वाचविण्याची त्यांची केविलवाणी ध़डपड सुरू आहे, अशी टीका भाजपा प्रदेशचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी सोमवारी येथे केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत काल, रविवारी ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता भाजपवर हुकूमशाहीचा आरोप केला होता. हुकूमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र यावे लागेल, असे ठाकरे म्हणाले होते. यावर भाजपाने आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले दिले.

- Advertisement -

हिंसाचार करून गरीबांना वेठीस धरणाऱ्या आणि देशात अस्थिरता माजविणाऱ्या नक्षलवाद्यांचे उघड समर्थन करणाऱ्यांच्या साथीने उद्धव ठाकरे लोकशाही वाचविणार की, लोकशाही संकटात टाकणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी यावेळी केला. सत्ता मिळविताना लोकशाहीचे सामान्य संकेत झुगारणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता सत्तेबरोबरच पक्ष देखील हातातून निसटल्यावर लोकशाही वाचविण्याचा साक्षात्कार व्हावा, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद आहे, अशी टीका त्यांनी केली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे हिंसाचार माजवितात आणि ज्यांनी सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली करण्याचे उद्योग केले, अशांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे लोकशाही वाचवायला निघाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंचा कांगावा हास्यास्पद
वैचारिक विरोधावर विश्वास नसलेल्या आणि दहशत माजविण्याचाच इतिहास असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबतही ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी युती केली. हिंदुत्वाची अस्मिता असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करणाऱ्या काँग्रेसपुढे गुडघे टेकले आणि सत्तेसाठी राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करून स्वाभिमान खुंटीला टांगला ते ठाकरे लोकशाही संकटात असल्याचा कांगावा करतात हे हास्यास्पद आहे, असे उपाध्ये म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण उघड
मुळात उद्धव ठाकरे यांनी स्वतःच लोकशाहीला तिलांजली दिली असून त्यांच्या हुकूमशाहीला कंटाळल्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. मातोश्रीवर भेटीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अपमानित करणे, त्यांना साधी भेटही न देता ताटकळत ठेवणे आणि एकाधिकारशाहीने पक्ष चालविणे हेच शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण असल्याचे उघड झाले आहे. ज्यांना पक्षातही लोकशाही टिकविता आली नाही, बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे भाजपाची साथ घेऊन सत्तेपर्यंत पोहोचलेला पक्ष ज्यांनी आपल्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे संपविला आणि ज्यांनी खंजीर, कोथळा अशा हिंसक शब्दांनी लोकशाहीच्या सभ्यतेला काळीमा फासला ते उद्धव ठाकरे आता पक्ष संकटात सापडल्यामुळे लोकशाही वाचविण्याचा ढोंगीपणा आणि पक्ष वाचविण्याची धडपड करत आहेत, अशी जळजळीत टीका केशव उपाध्ये यांनी केली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -