मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिक अगोदरच त्रस्त झाले आहेत. त्यातच पनवेल तालुक्यातील केळवणे गावात वानरांनी उच्छाद मांडला आहे. ही वानरे एका घरावरून दुसऱ्या घरांवर उड्या मारत असल्यामुळे पत्रे, कौलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विकासाच्या नावाखाली पनवेल, उरण तालुक्यातील जंगल भागात मोठ्या प्रमाणात दगड, मातीचे उत्खनन केले जात आहे. उन्हाळा, पावसाळ्यातही राजरोसपणे वन आणि महसूल अधिकार्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अशा उत्खननामुळे वन्यप्राणी अन्नाच्या आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. केळवणे परिसरातील जंगलातून वानरे मोठ्या संख्येने गावातील फळ झाडांवर, तसेच घरांच्या छपरावर वावरताना दिसतात. यात फळझाडांचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.
ऐन पावसाळ्यात घरावरील पत्रे, कौले फुटत असल्याने रहिवाशांचे हाल होत असून, वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा खलाशी महासंघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे, तसेच भावना शिवकर यांच्यासह इतर महिलांनी केली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने कोकणाला रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असून, मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
हेही वाचा – चिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरूच,कोव्हिड सेंटर पाण्याने घेरले 21 रुग्णांचा जीव धोक्यात