चौक: जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक यांच्याबरोबर आंबा काजू उत्पादक, त्याचप्रमाणे फळफळाव असणार्या झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टी मालक, बागायतदार चिंतेत आहेत. त्यामुळे शासनाने आम्हास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास काईनकर यांनी केली आहे.
गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता होती, त्यातुन तो होळीत येऊनही गेला आहे आणि अधूनमधून शिडकावा सुरूच आहे. अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टी मालक, बागायतदार यांच्याबरोबर भाजीपाला पिकविणारे चिंतेत आहेत. सध्या विट तयार झाली असून अनेक ठिकाणी ती सुकवण्याच्या प्रक्रियेत आहे,सुकलेली विट भट्टी लावण्यासाठी रचाई करून ठेवली आहे. अचानक झालेल्या पावसाने ही विट भिजली असून वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा,तुस,कोळसा भिजून चिंब झाला आहे.काही भागात पाणी साचल्याने विटांचा चिखल झाला आहे, तर रचाईच्या विटा भिजल्याने त्याची पुन्हा माती झाली आहे,पण ही माती पुनः उपयोगात आणत येत नाही. इतर साहित्य देखिल भिजून नुकसान झाले असून वीटभट्टी कामगार यांच्याही सामानाची मोठी नासधूस झाली आहे, त्यांचे अन्नधान्य भिजले आहे. अनेक वीटभट्टी मालक यांनी वीटभट्टीवर प्लास्टिक पेपर टाकण्याचा प्रयत्न केला पण ज्या वीटभट्टी पेटवल्या आहेत,त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेली काही वर्षे अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे, याची दखल शासनाने घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काईनकर यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी यांचा संप मिटला असून खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आंबा काजू व रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मंडळ अधिकारी किरण पाटील व त्यांच्या मंडळातील तलाठी यांनी नुकसान ठिकाणची पाहाणी करण्यास सुरूवात केली आहे.
चिरनेरमध्ये वीट व्यावसायिकांचे नुकसान
उरण: तालुक्यातील ग्रामीण भागात वीटभट्टी व्यवसाय सुरु असून मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. चिरनेर येथील सुजित पाटील यांचा पारंपारिक विट व्यवसाय असून त्याद्वारे ३० आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय हसुराम परदेशी, गोकुळ परदेशी यांच्या वीट कारखान्यांमध्येही अनेक कामगार करीत आहेत. मात्र तयार असलेल्या हजारो वीट पावसामुळे मातीमोल झाल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे या वीट व्यावसायिकांचे म्हणणे असून आहे. शासनाने याकडे लक्ष देत पंचनामे करावेत आणि आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.