कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध घातले असले तरी तालुक्यातील कोरोनाचा आलेख रोज वाढतो आहे. गेल्या दोन दिवसात 149 नवीन रुग्ण आढळले असून, 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनला आहे.
विविध मार्गदर्शक तत्वे आणि अंशतः लॉकडाऊन जाहीर केला गेला असला तरी मात्र जनता कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सरकारी निर्बंध धाब्यावर बसवून लग्न समारंभ, हळदी समारंभ, धार्मिक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. याचा दुष्परिणाम आता दिसून येत आहे. बुधवारी तालुक्यातील चारजणांचा कोरोनाने बळी गेला, तर 72 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना घडली असून, 77 नव्या रुग्णांची यामध्ये भर पडली आहे.
आतापर्यंत 8 हजार 298 रुग्ण सापडले असून, गुरुवारपर्यंत 605 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे. आतापर्यंत तालुक्यात 198 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये 142 पुरुष आणि 56 स्त्रियांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे.