महाड येथील एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी ज्या सामाईक प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून खाडीत सोडले जाते त्या सांडपाणी वाहिनीचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून, जुन्या वाहिनीला गळती लागल्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान जवळपास १२ दिवस कारखाने बंद ठेवण्यात आल्याने मोठे नुकसान होत आहे. कारखान्यांचे सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) आणून तेथून खाडी पट्ट्यामधील ओवळे गावात खाडीमध्ये सोडले जाते.
सीईटीपी ते ओवळे दरम्यान असलेली महाड औद्योगिक वसाहतीची सांडपाणी वाहिनी जीर्ण झाली आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने जुन्या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास सांडपाणी वहनाचा प्रश्न उद्भवतो.
– एस. एम. कवडगी, उप अभियंता, महाड एमआयडीसी
१९९६-९७ मध्ये टाकण्यात आलेली पीएससी मटेरियलमधील ही वाहिनी आता जीर्ण झाली आहे. यामुळे सातत्याने गळती लागत असल्याने परिसरातील शेतीचे आणि नदीचेही नुकसान होत आहे. यापूर्वी अनेकवेळा दादली, सव, गोठे, तुडील आदि गावात गळती होऊन भातशेतीचे नुकसान झाले आहे. सातत्याने होत असलेल्या या नुकसानीबाबत शासन दरबारी कायम आवाज उठवला गेल्याने सन २०१७ मध्ये नव्या वाहिनीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. २४ एमएलडी क्षमतेची जुनी ही सांडपाणी वाहिनी असून, आता नव्याने त्याच क्षमतेच्या वाहिनीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
ओवळेपासून पुढे २ किलोमीटर अंतरावर खाडीमध्ये वाहिनीचे काम केले जाणार आहे. सीईटीपी ते ओवळे ही जवळपास २४ किलोमीटरची वाहिनी एचउीपीई (हाय डेफिनेशन पॉली इथील) मध्ये टाकली जाणार आहे. याकरिता १०० कोटींचा सुधारित प्रस्ताव सन २०१९ मध्ये पुन्हा पाठवला असल्याचे सहाय्यक अभियंता ए. ए. अल्हाट यांनी सांगितले. प्रस्तावाला अद्याप निधी मंजूर झाला नसल्याने हे काम रखडले आहे. यामुळे जीर्ण झालेल्या वाहिनीमधूनच सांडपाणी ओवळे येथे नेले जात आहे.