सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाला थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ. नाथ पै (Barrister Nath Pai) यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांना ट्विटरच्या माध्यमातून विनंती केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, बॅ. नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आहे. पै यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा उमटविला होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्यामुळे त्यांच्या वारशाचा सन्मान करणे आवश्यक आहे. त्यामुळे चिपी विमानतळाला त्यांचे नाव दिल्यास भुमीपुत्राच्या स्मृती जतन करणे सिंधुदुर्गवासियांना शक्य होईल.
चिपी, सिंधुदुर्ग येथील विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी आहे. बॅ नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा उमटविला होता. संयुक्त… pic.twitter.com/zNF5MLBRFw
— Supriya Sule (@supriya_sule) May 15, 2023
याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक विचार करावा आणि सिंधुदुर्गातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन होकारार्थी निर्णय घ्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी सिंधिया यांना केली आहे. त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ट्विटरलला टॅगदेखील केले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे लोकार्पण ऑक्टोबर 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले होते. यावेळी चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. चिपी विमानतळावर विमान सेवा बरोबरच हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार असल्याचे लोकापर्ण करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.