घररायगडरब्बी पीक हातचे गेले, शेतकरी चिंतेत

रब्बी पीक हातचे गेले, शेतकरी चिंतेत

Subscribe

मुरुड तालुक्यातील एकूण 26 हजार 525 हेक्टर भौगोलिक क्षेत्रातील 3 हजार 300 हेक्टर भात पिकापैकी 300 हेक्टर शेत जमिनीत घेतली जाणारी रब्बी पिके हातची गेली आहेत. यावर्षी केवळ 25 ते 30 टक्केच रब्बी पीक हाती आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, पुढील काळाची बेगमी कशी करावी, या चिंतेने तो सध्या ग्रासला आहे.

शेतकरी आपल्या शेतीतील तयार भाताचे पीक सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत काढल्यानंतर महिन्याभरातच त्याच जमिनीतून वाल, चवळी, हरभरा, मूग, तूर आदी कडधान्य पिकांची पेरणी करतो. एप्रिल-मेपर्यंत या रब्बी पिकांचे चांगले उत्पन्न मिळते. भाताच्या जोडीला अशा प्रकारच्या कडधान्यामुळे शेतकर्‍यांची वर्षभराची तादात मिटून जात असते. तर येणार्‍या अनेक पर्यटकांकडून या कडधान्यांना मोठी मागणी असल्याने स्वतःपुरते ठेऊन उर्वरीत कडधान्यांच्या विक्रीतून शेतकर्‍यांना चार पैसेही मिळत असतात.

- Advertisement -

ही पिके खास करून जमिनीतील ओलाव्यावर होत असतात. परंतु गतवर्षी झालेल्या निसर्ग वादळामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे बदललेल्या वातावरणाने ऐन कडधान्यांच्या पेरणीच्या हंगामातच भरपूर पाऊस झाला. परिणामी जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात राहिला. विशेषतः पाणथळ भातशेतीतील चिखलामुळे अशा कडधान्यांची काही शेतकर्‍यांना पेरणीच करता आली नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांचे बियाणे चिखलात कुजल्याने उगवलेच नाही. तर अती ओलाव्यामुळे फुलोर्‍याला फलधारणा न होताच त्यातील फुलांची गळती झाली. त्यामुळे पीक पुरते ढेपाळले.

शेतकर्‍यांनी केलेले श्रम, वेळ आणि पैसा वाया जाऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पावसाळी हंगामात ही कडधान्ये शेतकर्‍यांच्या दोन वेळेच्या भोजनासाठी उपयोगी पडत असत. समुद्रातील मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमारी बंद पडली आहे. यावर्षी कडधान्येही हातची गेली आहेत. कोरोना महामारीचे संकट, निसर्गसह तोत्के चक्रीवादळाने नारळ, सुपारी, आंबा आदी पिकेही नेस्तनाबूत झाली आहेत. अशा संकटांनी ग्रस्त शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -