गेल्या २४ तासांत राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहर तसेच लगतच्या परिसरात पाणी साचले आहे. याठिकाणी लगतच्या दासगाव व केंबुर्ली परिसरात साळुंखे रेस्क्यू टिमने पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असून, सुखरूप ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाडमध्ये भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. सखल भागात, अनेक ठिकाणी पाणी भरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील दासगावमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या ९ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पुढील तीन दिवस कोकणाला रेड अलर्ट
अतिवृष्टीमुळे राज्यातील काही जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोकणाला रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असून, मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी, कोकण विभाग आयुक्त, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याशी चर्चा करुन तात्काळ आपत्कालीन विभागाकडून मदत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – कोरोनाच्या भीतीनं अनिश्चित काळासाठी समाज बंद करुन ठेवणार का?, चंद्रकांत पाटील यांचा सवाल