कर्जतपासून जवळच किरवली गाव आहे. सतरा वर्षांपूर्वी उभारलेली गावाला पाणी पुरवठा करणारी नळ पाणी योजना सहा महिन्यांपूर्वी बंद पडल्याने गावकर्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे ही नळ पाणी योजना त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
उल्हास नदीवर ही नळ पाणी योजना आहे. नदीतून पाणी उपसून याच भागातील एका विहिरीत सोडण्यात येते तथा साठवले जाते. तेथून मग नळ पाणी योजनेद्वारे ग्रामस्थांना पुरवले जाते. मात्र जुलै महिन्यात जोरदार झालेल्या पावसात विहिरीची पडझड होऊन ती कोसळली. पंपही नादुरुस्त झाला. तेव्हा पासून नळ पाणी योजना बंद आहे. त्यामुळे येथील महिलांना गावातील खाजगी बोअरवेल चा आधार घ्यावा लागतो. मात्र त्याचा लाभ सर्वानाच मिळत नाही. त्यामुळे काही ग्रामस्थ एकत्र येऊन टँकरने पाणी मागवतात. मात्र हे सर्वांना कायम आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. तसेच गावात रस्त्यावरच टँकरने पाणी वाटप होत असल्याने टँकरमधील बरेचसे पाणी खाली पडून रस्ता चिखलमय होत आहे. तरी ग्रामपंचातींनी त्वरित याची दखल घेत नळ पाणी योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
आमदारांनी यामध्ये लक्ष घातले असून ते लवकरच जल जीवन मिशनच्या माध्यमातून नवीन पाणी योजनेसाठी निधीची उपलब्धता करून देणार आहेत. जुलैच्या पावसात विहिरींची पडझड झाली आणि त्यावर बसविलेला वीज पंप नादुरुस्त झाला. आम्ही नळ पाणी योजना दुरुस्तीचे काम हाती घेतले असून लवकरच ग्रामस्थांना पाणी मिळेल, असे सरपंच संतोष साबरी यांनी सांगितले आहे.