अलिबाग :अमूलकुमार जैन
धरमतर खाडीत वाळू माफियांनी पुन्हा बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु केले. सक्शन पंपाद्वारे होणाऱ्या या वाळू उत्खननामुळे १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या काचली-पिटकीरी धुपप्रतिबंधक बंधाऱ्यालाही भगदाड पडण्याची शक्यता आहे. हा बंधारा फुटल्यास कुसुंबळे कुर्डूस परिसरातील बाराशे एकर जमीन नापिक होण्याची भीती येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. वाळू माफियांचे हे प्रताप वेळेत न थांबल्यास धरमतर खाडीत उतरुन वाळू उत्खनन करणारे सक्शन पंप, होड्यांना जलसमाधी दिली जाईल, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी दिला आहे. यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला संपुर्णपणे महसुल विभाग जबाबदार राहील असेही त्यांनी सुचीत केले आहे.
संक्शन पंपाद्वारे वाळू उत्खनन करण्यास न्यायालयाने बंदी घातलेय, तरीही धरमतर खाडीत न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांच्या समक्ष उल्लंघन होत आहे. तरीही महसुल विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने काचली-पिटकीरी वाघविरा चिखली कुर्डूस परिसरातील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. या उत्खननातून शासनाचा लाखो रुपयांची महसूल बुडवला जात आहे. त्याचबरोबर येथील पिकत्या भात शेतीलाही धोका पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे वेळेतच थांबणे आवश्यक असल्याचे म्हणणे बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांचे म्हणणे आहे. या परिसरात मोठमोठे सक्शन पंप लावण्यात आलेले आहेत. या उपशाने बांधबंदिस्ताचा भरावही खचत चालला आहे. यामुळे ही बांधबंदिस्ती केव्हाही ढासळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला तडा जाण्याची शक्यता
ही परिस्थिती अशीच वाढत राहिल्यास २५ एप्रिल २०१६ साली वाळू माफीयाच्या विरोधात राजाभाई केणी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते त्या वेळी काचळी कुसुंबळे पिटकिरी वाघविरा चिखली हेमनगर नवीन वाघविरा कुर्डूस या गावातील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी राजाभाई केणी यांच्या उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला होता त्यानंतर महसूल विभागाने कारवाही करून गेली सहा वर्षे वाळू उपसा करण्यास बंदी केली होती आणि आता १८ कोटी रुपये खर्चून केंद्र शासनाने बांधलेल्या काचली- पिटकीरी धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला तडा जाण्याची दाट शक्यता असल्याचे येथील शेतकरी ओरडून सांगत आहेत. या संर्दभात वारंवार तहसिल कार्यालायत तक्रारी करुनही महसुलचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अखेर खाडीच्या पाण्यात उतरुन जलआंदोलन करण्याची वेळ आल्याचे राजाभाई केणी यांनी सांगितले. या आंदोलनात सर्व वाळू उत्खनन साहित्यांना जलसमाधी दिली जाईल, यात या परिसरातील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.