अलिबाग (अमूलकुमार जैन) : मुरूड तालुक्यातील साळाव ते मुरूड या रस्त्याचे काम निकृष्ट आणि बोगस काम केल्याने मुरूड तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पूर्णतः पाठ फिरवली असल्याने येथील छोटे मोठे उद्योजक सहित नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून बोर्ली नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Shinde group aggressive over poor road work block road at Borli Naka Demand to file a case against the company)
हेही वाचा – आता श्रीवर्धन समुद्रकिनारी सापडली अमली पदार्थांची पिशवी; लागोपाठ घडतायेत घटना
साळाव ते मुरूड या रस्त्याच्या कामाची निविदा सात कोटी अठ्ठावीस लाख इतकीहोती. साळाव मुरूड रस्त्याचे पन्नास टक्के काम झाले असले तरी कंपनीने स्थानिक नागरिक यांच्यासहित येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यामुळे हाल अपेष्टा सहन कराव्या लागण्यासाठी काम अर्धवट ठेवून रस्त्याचे देयक गिळंकृत केले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकामध्ये सुप्रभात कन्ट्रक्शन या कंपनीविरोधात चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. आंदोलनावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, जिल्हा महिला संघटिका शुभांगी करडे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ, उपतालुका प्रमुख भगीरथ पाटील, भारत मोती, राजा चवरकर, चक्रधर ठाकूर, अजय भोईर सहित तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा – अलिबागकरांची सतर्कता, अंगठ्या विकण्यासाठी आलेल्या तीन संशयितांना दिले पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, साळाव ते मुरूड मुख्यः रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना रिक्षा, चार चाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे खड्डे तत्काळ सिमेंट कॉक्रिटने भरण्यात यावेत, जेणेकरून पावसाळयात पुन्हा खड्डे पडणार नाहीत. तसेच सध्या केलेला रस्ता सुध्दा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणून सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अदयापही सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले नसल्यामुळे शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आले.