घररायगडरामदास बोट दुर्घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी; जगन्नाथ मुंबईकर

रामदास बोट दुर्घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी; जगन्नाथ मुंबईकर

Subscribe

रामदास बोट दुर्घटनेला शनिवार, १७ जुलै रोजी ७३ वर्षे पूर्ण झाली असून जगन्नाथ गोरक्षनाथ मुंबईकर हे या दुर्घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत.

‘आज बरोबर ७३ वर्षे झाली त्या घटनेला… वयाच्या ८७ व्या वर्षीही तिची थोडी जरी आठवण झाली तरीदेखील अंगावर सर्कन काटा उभा राहतो. ते चित्र माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही. मी माझ्या आई-वडिलांसोबत आजी, आत्या, काका-काकी, चुलत भाऊ-बहिणीला एका क्षणात गमावले. केवळ पंढरपूरच्या वारीने मिळालेले मानसिक व आत्मिक बळ तसेच मजगावचे ग्रामदैवत मल्हारी दत्तांच्या कृपेनेच वाचलो…, हे उद्गार ८७ वर्षीय पोटाची खळगी भरण्यासाठी भाजीपाला व फळे विक्रीचे दुकान चालविणाऱ्या मजगावच्या जगन्नाथ गोरक्षनाथ मुंबईकर यांचे आहेत.

रामदास बोट दुर्घटनेला शनिवार, १७ जुलै रोजी ७३ वर्षे पूर्ण झाली असून मुंबईकर हे या दुर्घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत. पंढरपूरच्या वारीसाठी आजी, आजोबा, आई-वडिलांसह काका- काकी, आत्या तिचे पती, चुलत भाऊ, बहीण आदी ८-१० जणांबरोबर ते वारी पूर्ण करून भाऊच्या धक्क्यावरुन रेवसमार्गे मजगावला परतणार होते. मुरुडमधील ६० ते ६५ जण त्यावेळी बोटीतून प्रवास करणारे प्रवाशी होते. त्यावेळी जगन्नाथ मुंबईकर केवळ दहा वर्षाचे होते. ते सर्वजण सकाळी ८ वाजताच भाऊच्या धक्क्यावर पोहोचले. तिकिटे मिळाल्यामुळे ते खूश होते. त्या काळी बॉम्बे शिपिंग कॉर्पोरेशनच्या रामदास व जयंती या दोन प्रवासी बोटी भाऊचा धक्का ते रेवस अशा प्रवाशी वाहतूकीच्या बोटी होत्या. रामदास ही तीन मजली मोठी बोट होती.

- Advertisement -

वारीहून परतलेल्या तसेच व्यापारी व अन्य प्रवाशांच्या मोठ्या संख्येने बोट पूर्णपणे भरली होती. मुरुड जंजिऱ्याचे नवाबही याच बोटीने मुरूडला येणार होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे येणे रद्द झाले. सकाळी ९ वाजता तिने धक्का सोडला आणि सपासप पाणी कापत काशाच्या खडकाजवळ आली. काळच जणू न्यायला यावा तसा हवामानात एकदम बदल झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला व जोराजोरात पाऊस पडू लागला. बोटीचे पडदे सर्वांनी बंद करुन घेतले. आधिच तिरकी चालत असलेली रामदास बोट एका मोठ्या लाटेवर भरकटली. कॅप्टनने तिला सुकाणूच्या सहाय्याने वळवण्याचा प्रयत्न करताच ती एका बाजूला कलंडली. तसे प्रवाशीही त्या बाजूकडे सरकले. एका बाजूला वजन होताच बोटीत पाणी घुसले कॅप्टनसह सर्वजण घाबरले आणि काय होत आहे, हे कळायच्या आतच बोट बुडू लागली.

काहींनी बाहेर उड्या मारल्या. तर कित्येक जण बुडू लागले. मुंबईकरांचे आजोबा मच्छीमारच होते. त्यांच्या गळ्यात असलेल्या चाकूने त्यांनी बोटीचे पडदे फाडून आई, आजी व इतरांसह त्यांना बोटीतून बाहेर खेचून काढले. त्यांच्या केसांना धरून ते मोठ्या हिंमतीने पाण्यात पोहू लागले. त्यांनी मुंबईकरांना बाहेर काढताच शेजारच्या कोंडाजी यांनी त्यांना आपल्या पाठीवर बसवले. समुद्राचे पाणी बोटीत घुसताच बोटीतील ब्रॉयलरचा स्फोट झाला आणि त्यातील गरम पाण्याने कित्येक जण भाजले. तर पलटी झालेल्या बोटीखाली दाबले गेले. त्यांना जलसमाधी मिळाली.

- Advertisement -

दरम्यान, बोटीतील बाहेर पडलेल्या पाण्यावर तरंगत असलेल्या एका मोठ्या बोयाला पकडून मुंबईकरांचे आजोबा, मुंबईकर कोंडाजी व अन्य पाचसहा जण पहाटेपर्यंत आलेल्या संकटाशी टक्कर देत होते. एका हेलिकॉप्टरने काहींना वाचवले. बऱ्याच वेळाने आलेल्या दुसऱ्या एका बोटीनेआम्हाला वर घेतले. त्यांनी रेवसला सोडून अलिबागला जिल्हाधिकाऱ्यांना खबर दिली.

छोट्या मुलाच्या भाजीपाला, फळे विक्रीच्या दुकानात काम करत आहेत. शासनाकडून आजवर ना कोणी दखल घेतली ना मृत पावलेल्यांना मदत केली, याची खंत त्यांना अद्यापही वाटते. अलिबाग तालुक्यातील बारक्याशेठ मुकादम, नांदगावचे अल्लिमिया बाळू (हलडे), रकबीचंद जैन हे देखील याच बोटीतून बचावलेले त्यांचे निधन झाले आहे. परंतु मुंबईकर हे आता एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उरले आहेत.

उदय खोत – वार्ताहर, नांदगाव

हेही वाचा –

हिंदमाता येथे पाच फुटापर्यंत साचणारे पाणी आता फक्त गुडघाभर; महापौरांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -