कर्जत रेल्वे स्थानकाला अगदी खेटूनच तुलसी गृहनिर्माण संकुल उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र हे बांधकाम करताना विकासकाने अटी शर्तींचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वाढीव केलेले बांधकाम तात्काळ तोडून टाकावे व त्याचा अहवाल संबंधित रेल्वे प्रशासन व कर्जत नगर पालिकेला सादर करावा, अन्यथा प्रचलित अधिनियमानुसार कार्यवाही करून दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येतील, अशी नोटीस मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी विकासकाला बजावली आहे. कर्जत मुबई मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या १ क्रमांकाच्या फलाटापासून अगदी थोड्या अंतरावर तुलसी गृहनिर्माण असोशिएटसचे इमारती उभारण्याचे काम सुरु आहे. स्थानकालगतच काम सुरु असल्याने रेल्वे प्रशासनाचे काही विशिष्ट नियम व अटी आहेत.
रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून विकासकाने बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे पत्र प्राप्त झाले होते. त्यांनी पाहणी करून अहवाल मागवला होता. त्यानुसार पाहणी केली असता नियम,सअटी शर्तींचा भंग केल्याचे लक्षात आल्याने विकासकाला याबाबत नोटीस बजावली आहे.
– डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद, कर्जत
यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रथम रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाचा ना हरकत दाखला घेणे क्रमप्राप्त आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या इमारतीची उंची फक्त १०.६ मीटर पर्यंतच मंजूर आहे. तसेच इमारतीतील सांडपाणी रेल्वे हद्दीत सोडता कामा नये, असे कडक नियम आहेत.
रेल्वे प्रशासनाकडे या बांधकामाला ना हरकत दिल्याचे पत्र माहिती अधिकारात मागवले असता त्यांनी याबाबतचे कागदपत्रच उपलब्ध नसल्याचे सांगितले. दिवसाढवळ्या नियमांचे उल्लंघन करत एवढे मोठे बांधकाम होत असतांना रेल्वे आणि पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकाऱ्यांनी का कारवाई केली नाही. आता तरी रेल्वे प्रशासनाने, पालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि सदनिकाधारकांची होणारी फसवणूक थांबवावी.
– अमोघ कुलकर्णी, माहिती अधिकारी कार्यकर्ता, कर्जत
मात्र संबंधित विकासकाने या नियमांचे उल्लंघन केल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्ता अमोघ कुलकर्णी याच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब पत्रव्यवहाराद्वारे मध्य रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत इमारत बांधकाम परवानगी कर्जत नगर पालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने पालिकेला या बांधकामाची तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्याना पाठवून पाहणी करण्यास सांगितले. या पाहणीत विकासकाने बांधकाम करताना नियमनाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसून आले.
आरटीआय अध्यक्ष अमोघ कुलकर्णी यांनी दोन महिन्यांपूर्वी सर्व नगरसेवकांना इमारतीबाबत पत्र दिले होते. मात्र काही नगरसेवकांनी दुर्लक्ष केले तर विरोधी नगरसेवकांनी याबाबत मासिक सभेत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांना खुलासा विचारला असता यावर कोणत्याही प्रकारे उत्तर देता न आल्याने कदाचित नियमबाह्य बांधकामांना नगरपरिषदेचे वरदहस्त असल्याची चर्चा आहे.
– ज्योती जाधव, वार्ताहर, कर्जत
हेही वाचा –
गणेशोत्सवावरील निर्बंध शिथिल करा! अन्यथा ठाणे महापालिकेपुढे आंदोलन